आपलं महानगर
दिनांक - ३१ मार्च २०१९
थिएटर ऑफ रेलेवन्सच्या प्रक्रियांमध्ये काही चूक आणि बरोबर असं नसतंच. कारण चूक आणि बरोबर हे तुम्हाला एका निष्कर्षावर आणून ठेवतात आणि तिथे आपले मनन, चिंतन थांबते. आमच्या बालनाट्य कार्यशाळेमध्ये चूक व बरोबर या पलीकडे, निर्माण आणि विध्वंस हा नवीन दृष्टीकोन आम्ही मुलांना देतो.
लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा
संत तुकारामांच्या या ओळी आठवल्या की बालपणात हरवून जायला होतं. पुन्हा एकदा लहान व्हावंसं वाटतं. बालपणातील धम्माल, मस्ती सारंकाही आठवतं. बालपणाच्या आठवणी ताज्या होऊन गमतीदार किस्से आठवतात, आपली स्वप्ने आणि सतत नवीन काही करण्याची इच्छा, लहानपणी वेगवेगळे प्रयोग करून स्वतःहून नवीन शोधण्याची उर्मी या सार्या बालपणातील आठवणी आयुष्यातील अशा काळात घेऊन जातात जिथे आपण असतो, आपल्यावर कशाचाच पगडा नसतो. समाजाचा, संस्कृतीचा, ना परंपरांचा कशाचाच नाही. आपल्या चेहर्यावर मुखवटेही नसतात. असते ते निरागस, निर्मळ मन आणि या निरागस मनाला अभिव्यक्त व्हायचं असतं आपल्या पद्धतीने… आता ही बाल्यावस्था समाजातील कोणत्याही स्तरावरील असो गरीब, श्रीमंत, उच्चभ्रू वा दारिद्य्ररेषेखालील, नामवंत वा वंचित, महालात राहणारे असो व रस्त्यावर हे लहान कोवळे मन आपल्या पद्धतीने-स्वेच्छेने अभिव्यक्त व्हायला जाते तेव्हा समाज त्याला एका साचेबद्ध जीवनपद्धतीत अडकवत जातो.
मला हे नाही करायचे, हे माझ्या मनाविरुद्ध आहे हे कोणी ऐकणारच नसतं. जसजसे वय वाढत जाते तसतसे कंडिशनिंगचे स्तर वाढत जातात. मग हळूहळू आपण या रॅट रेसचा एक भाग होतो. अपेक्षांचं ओझं पेलता पेलता आपण फक्त शरीराने मोठे होतो… विचार अभिव्यक्ती कुंठित होते आणि रम्य बालपण वाळूच्या कणांसारखं हातातून निसटून जातं..आज आपण याच बालपणातील शहाणपणाची गोष्ट करणार आहोत.अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा व्यक्तिगत स्वातंत्र्याप्रमाणेच संविधानाने दिलेला, लोकशाही मूल्यांवर आधारित मूलभूत मानवी अधिकार आहे आणि हा मला माझ्या जन्मापासूनच मिळतो. मुक्तपणे अभिव्यक्त होण्याकरता आपल्याला पोषक कौटुंबिक, सामाजिक वातावरण सहाय्य करू शकते; पण आपल्याकडे ही स्थिती विरोधाभासी आहे.
विकसनशील असलेल्या भारतात आज लहान मुलांच्या बाबतीत भीषण समस्या दिसून येतात:
१) देशातील एकूण जनसंख्या पैकी एक पंचमांश मुले-मुली शाळेबाहेर आहेत, शाळेपासून वंचित आहेत.२) समाजात पाहता किती टक्के लहान मुले आपल्याला रस्त्यावर अनाथ बेवारस दिसतात. पुरेशा प्रमाणात सुरक्षा, शिक्षणाचा अभाव तसेच स्वच्छतेच्या सुविधांपासून वंचित असलेली ही मुले शहरातील रस्त्यांवर अत्यंत असुरक्षित वातावरणात आयुष्य जगत असताना आपण पाहतो.
३) बाल मजुरी
४) पालक मुलांना मारतात, वर्गात शिक्षक मुलांना मारतात.
५) जाती-धर्मामुळे वंचित असलेली मुले
६) मुलांच्या टक्केवारीनुसार किती टक्के मुली आहेत, मुलीचा गर्भ मारणे किंवा मुलीला जन्मानंतर मारणे.
७) मुलगी म्हणून कुटुंबात-समाजात अवहेलना.
८) बालविवाह, बलात्कार आणि छळ.
९) दर पाच मुलांमधून तीन मुलं लैंगिक शोषणाला बळी पडतात.
१०) एकंदर समाजात असा समज झालेला आहे की, मुले ही फक्त त्यांच्या पालकांची संपत्ती आहे.
११) लहान मुलांना स्वतःचे विचार मांडणे, चांगल्या वाईटाची निवड करणे, निर्णय घेण्याची कुवत नसते असा समज आहे.
१२) त्यांना समजून मदत करण्याऐवजी त्यांच्यावर मोठ्याचे विचार लादले जातात.
१३) मुख्यत्वे लहान मुलांच्या अभिव्यक्तीला दरक्षणी खोडले जाते.
हो, भारतीय समाजातील काही मुलांच्या जीवनाची ही वस्तूस्थिती आहे. या समस्यांचा समाज दृष्टिकोनातून अभ्यास केला तर हे समजून येतं की मुळातच लहान मुलांवर शोषण करण्याची मानसिकता भारतात जास्त प्रमाणात आढळून येते. भारत लहान मुलांच्या बाबतीत सर्वात निर्दयी, निष्ठूर मानसिकतेचा देश आहे. इथे मला असं वाटतं की, मोठ्यांनी लहानांना सतत टोचून बोलण्यापेक्षा, त्यांच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांना ओरडण्यापेक्षा, त्यांच्या अंतर्मनाला समजून घेणे आवश्यक आहे, ते जसे अभिव्यक्त होऊ पाहतात तसे त्यांना होऊ द्यावं, त्यांच्या चुकांतून त्यांना शिकण्याची संधी देणे अपेक्षित आहे, त्यांच्यासोबत संवाद व सहवास करणे अपेक्षित आहे.या अभिव्यक्तीच्या पैलूंना केंद्रित करून आम्ही लहान मुलांसोबत वेगवेगळ्या विषयांवर थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य कार्यशाळा केल्या. या नाट्य कार्यशाळांमधून अभिव्यक्तीचे, संवादाचे, सर्जनशीलतेचे आणि कलात्मकतेचे महत्त्व मुलांना समजले.मुळात थिएटर ऑफ रेलेवन्सच्या प्रक्रियांमध्ये काही चूक आणि बरोबर असं नसतंच; कारण चूक आणि बरोबर हे तुम्हाला एका निष्कर्षावर आणून ठेवतात आणि तिथे आपले मनन, चिंतन थांबते. या बालनाट्य कार्यशाळेमध्ये चूक व बरोबर या पलीकडे, निर्माण आणि विध्वंस हा नवीन दृष्टीकोन मुलांना आम्ही देतो.
निर्माण आणि विध्वंस हा दृष्टीकोन मुलांमध्ये रुजला की, प्रक्रियेला सुरुवात होते आणि प्रक्रिया सतत आपल्याला उत्क्रांत करण्यास प्रेरित करत असते. मनुष्याची जीवन प्रक्रिया म्हणजे उत्क्रांतीची प्रक्रिया आहे. अभिव्यक्तीचा काय अर्थ आहे आणि आपण का अभिव्यक्त होतो? हे प्रश्न आम्ही मुलांना विचारले तेव्हा मुलांनी याची विविध उत्तरे दिली की, आपल्या मनात येणारी भावना, विचार, संवेदना, कृती आपल्या स्वयंप्रेरणेने व्यक्त करणे म्हणजे अभिव्यक्ती. या बालनाट्य कार्यशाळांमधून या लहानग्यांनी अभिव्यक्त या शब्दाचा अर्थ आणि त्याच्या व्यापक स्वरूपाला कलात्मक उंची प्रदान केली. आपल्या छोट्या मोठ्या जीवन अनुभवांना एकत्रित करून आपल्याला जाणवते तसे, आपल्या पद्धतीने, आपल्या कल्पकतेने नाट्य स्वरूपात रचून त्यांना व्यक्त केले. ज्यातून बाल कलाकारांत आपल्या विषयाची स्पष्टता, कठीण शब्दांच्या अर्थाची उकल आणि आपण स्वतःच निर्माण करू शकतो हा विश्वास दृढ होत होता.
नाटकातून स्वतःला अभिव्यक्त करणे म्हणजे जीवनातील आव्हानांना वैचारिक दृष्टिकोन देऊन त्यांना सहज करून स्वीकारण्याची ताकद मिळणं. अभिव्यक्त होणं किती महत्त्वाचं असतं. भावना दाबून ठेवल्या की, त्याचे विष होऊन जाते. जे व्यक्तीला पोखरून पोखरून टाकते. मनात असणार्या भावना आपल्या आवडत्या आणि आपल्यातील विश्वासू व्यक्तीला सांगणे हा एक पर्याय या नाट्यकार्यशाळांमधून लहानग्यांनी दिला. याचे एक उदाहरण असे की, कार्यशाळेमध्ये दररोज आपल्या आवडत्या ताईला किंवा दादाला (कार्यशाळा मार्गदर्शकास) एक पत्र लिहायचे, सोबत एक पत्र आईबाबा व स्वतःलाही लिहायचे यातून मुलांनी अशा काही मुद्यांना या पत्रातून मांडले ज्यांच्याविषयी सहसा त्यांच्या घरी संवाद होत नसे. या प्रक्रियेतून मुलं व पालक यांच्यात असलेली संवादाची पोकळी भरून निघाली. मुलांच्या अभिव्यक्तीला प्राधान्य द्यायचे महत्त्वदेखील पालकांना पटले.
या कार्यशाळेत मुलांनी नाटकाच्या माध्यमातून स्वतःला अभिव्यक्त केले. स्वतः लिखाण व दिग्दर्शन केले. कोणतीही वस्तू व घटक घेऊन त्याच्याशी संवाद साधने त्या माध्यमातून स्व:संवाद साधणे अशा वेगवेगळ्या अभिव्यक्त होण्याच्या पद्धती ‘चला अभिव्यक्त होऊया’ या कार्यशाळेमध्ये अनुभवायला मिळाल्या. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या छोट्या साथीदारांनी-अभिव्यक्त या जड शब्दाला अगदी सहजतेने आपल्या कलाकृतीतून सादर केले.
या नाट्य कार्यशाळेत संविधानाच्या समानता या तत्वालाही स्पष्ट केले. समानता या तत्वाला सखोलतेने समजले का? आपण समानतेला मानतो; पण या तत्त्वाला आयुष्यात अमलात आणतो का? मुलांच्या आयुष्यात म्हणजेच त्यांचे घर, परिवार आणि समाजात त्यांना वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जाते, समजले जाते आणि मुलगा असेल तर वेगळी वागणूक आणि मुलीला चौकटीत अडकवले जाते. तसेच स्वतःच्या प्रत्येक हावभावांना, आवाज, उठण्या बसण्याची पद्धत, मोकळेपणा या अभिव्यक्तीच्या पैलूंना नियंत्रित केले जाते. पण बालनाट्य कार्यशाळेतून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, मुक्तपणे मोकळेपणाने वापरण्याची मोकळीक असते.मुलांचे व्यक्तिस्वातंत्र्य.मुलांना माहिती मिळण्याचे स्वातंत्र्य.विचार स्वातंत्र्य म्हणून इथे मुलं अभिव्यक्त होतात. आम्ही मुलांना हे सांगतो की, ही जागा माझी आहे हे मोठ्याने बोला. हे जीवन माझे आहे हे बोला. ही केवळ वाक्य असली तरी यात मुलांच्या सर्जनशीलतेला शोधणारी आणि बदलणारी प्रक्रिया इथे होते.नाटक म्हणजे केवळ अभिनय करणे नव्हे. नाटकांची परिभाषा अभिनय शैलीच्या पलीकडे आहे … नाटक म्हणजे आपल्याशी संवाद साधणे आणि आपल्या विचारांचा व भावनांचा समतोल राखणे. मन, भाव व शरीर यांची सांगड घालणे. नाटक म्हणजे विचार, विचार म्हणजे शोध, शोध म्हणजे नावीन्य आणि प्रत्येक क्षण नवीन म्हणजे बालपण. कलेच्या माध्यमातून व्यक्ती म्हणून स्वतःला अभिव्यक्त करण्याची प्रक्रिया, उन्मुक्त होण्याची प्रक्रिया लहान मुले अनुभवतात. अभिनयासाठी अभिव्यक्ती नाही तर जीवन सक्षम करण्यासाठी अभिव्यक्ती हा मूलमंत्र या कार्यशाळांमधून मुले घेऊन जातात.
सायली पावसकर


No comments:
Post a Comment