Pages

Friday, January 16, 2026

The Other World : विनाशाचे सत्य उलगडणारे ‘द अदर वर्ल्ड’- – सायली पावसकर

 आपलं महानगर , दिनांक 17 जानेवारी 2026

The Other World : विनाशाचे सत्य उलगडणारे ‘द अदर वर्ल्ड’


निसर्गाचं रक्षण म्हणजेच स्वत:चं रक्षण. माणसाच्या या विस्मरणाचा आणि त्यातून निर्माण झालेल्या विनाशाचा तीव्र दस्तऐवज उलगडण्याचे काम थिएटर ऑफ रेलेवन्स करत आहे. रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक ‘द अदर वर्ल्ड’ नाटक याच वास्तवाचा कलात्मक हुंकार आहे. माणसाच्या चेतनेला जागवणारा, त्याला नदीसारख्या प्रवाही विचाराशी जोडणारा. जेव्हा मनुष्याच्या चेतनेत नदी वसते, तेव्हा तो तिला दूषित करत नाही, उलट तिच्या प्रवाहात आपल्या जगण्याला प्रवाहित करतो.


– सायली पावसकर



माणूस विसरून गेला आहे की तोही निसर्गाचा एकात्म भाग आहे. आज जेव्हा एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती समोर येते, तेव्हा राजकारण, समाजकारण, अर्थकारण हे सगळे मुद्दे एका क्षणात बाजूला सरकतात. कारण निसर्ग जेव्हा आपले रौद्र रूप धारण करतो, तेव्हा आपण किती खुजे आहोत हे जाणवते. मग तो कुठलाही प्रगत देश असो वा गरीब गाव. केदारनाथच्या पुरापासून ते वायनाडमधील दुर्घटनेपर्यंत ते आता मराठवाड्यातील पुराची स्थिती अशा प्रत्येक संकटामागे मानवी हस्तक्षेप, निसर्गाची अयोग्य छेडछाड हीच मुख्य कारणे आहेत.


आजचा माणूस स्वत:ला अत्यंत सुज्ञ, प्रगत आणि सक्षम समजतो. त्याच्या हातात तंत्रज्ञान आहे, विज्ञान आहे, सत्ता आणि पैसा आहे. त्याला वाटतं तो आपल्या गरजेनुसार काहीही मिळवू शकतो, खरेदी करू शकतो. पण या खरेदी आणि विक्रीच्या काळात त्याने एक मूलभूत गोष्ट विसरली आहे, प्रकृती विकत घेता येत नाही. आज समाजातील प्रत्येक गोष्ट विक्रीखाली आहे. सत्ता, न्याय, धर्म, नाती, शरीर, शिक्षण, पाणी, हवा, जंगलं, आणि अगदी माणूसही!


खरेदी-विक्री हीच आता विकासाची व्याख्या ठरली आहे. या स्पर्धेच्या बाजारात माणूस नागरिक नाही तर ग्राहक बनला आहे, आणि त्याचं अस्तित्व एक वस्तू झालेले आहे. पूर्वी स्वातंत्र्य आणि हक्कांसाठी लढणारा मनुष्य आज स्वत:ची मतेदेखील विकतो आहे. जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण या स्वप्नाळू शब्दांनी त्याला ‘मुक्ततेचं स्वप्न’ दाखवलं, पण प्रत्यक्षात त्या स्वप्नानेच त्याची गुलामगिरी नव्या स्वरूपात परत आणली. माणूस ‘समान’ झाला नाही, तर तो ‘सामान’ बनला.


विकासाच्या नावाखाली चाललेला हा ‘भोगवादाचा बाजार’ अखेरीस विनाश ठरत आहे. माणसाला वाटलं की विज्ञानाच्या बळावर तो पंचतत्त्वांवर विजय मिळवू शकेल. पण हे पंचतत्त्व वायु, जल, अग्नी, पृथ्वी, आकाश हे फक्त नैसर्गिक घटक नाहीत, ती जीवनाची पायाभूत समतोलरचना आहेत. जेव्हा माणूस या समतोलला हादरवतो, तेव्हा निसर्ग उत्तर देतो. वणव्यांनी, पुरांनी, दुष्काळांनी आणि हवामान बदलाच्या संकटांनी. आज आपण मानवजातीचा ‘अभूतपूर्व वैज्ञानिक विकास’ म्हणून गौरव करतो. प्रगत तंत्रज्ञान, वेगवान संगणक, अंतराळात उड्डाण करणारी रॉकेट्स, पृथ्वीभोवती फिरणारे असंख्य उपग्रह या सर्वांचा आपण अभिमान बाळगतो. पण हा विकास नेमका कुठे घेऊन जातोय, हे प्रश्न आपण स्वत:ला विचारायलाच तयार नाही.


वैज्ञानिक विकासाच्या नावाखाली चाललेला हा अंधभोगवाद, पृथ्वीचे शोषण करणारे विकासाचे मॉडेल आता तुटायला लागले आहे. ही वेळ आहे जगाला नव्याने पाहण्याची, स्वत:ची वाट नव्याने आखण्याची. विकासाचा अर्थ आहे समतोल, संरक्षण आणि सहजीवन, नाही की फक्त उपभोग, विनाश आणि संपत्तीची स्पर्धा. भोगवादी विकासाच्या जाळ्यातून बाहेर येऊन आपण विवेकी ज्ञानाला समजायला हवे. आज थोडं थांबून आपण प्रकृतीचा विचार करूया. आपण जगतो ते नक्की कशासाठी? माती हवी अन्नासाठी, पाणी हवं जगण्यासाठी, हवा हवी श्वासासाठी. पण हे तिन्ही आज दूषित झाले आहेत. पण माणूस अजूनही अंध आहे. त्याला दिसतं फक्त ‘विकासाचं स्वप्न’, पण जाणवत नाही ‘विनाशाचं वास्तव’. आजही जंगलं तोडून तो महामार्ग बांधतो, गावे उद्ध्वस्त करून शहरं उभी करतो, आणि मग त्या शहरांमध्येच श्वास कोंडतो आणि मोकळा श्वास घेण्यासाठी बाजाराने दिलेले एअर प्युरिफायर उभे करतो. आज जगात जे घडतंय युद्धं, महामारी, हवामानबदल समुद्राचा स्तर वाढतोय हे सगळं एका मूलभूत विसरामुळे आहे. माणूस विसरला की तो प्रकृतीचा भाग आहे, मालक नाही. त्याला वाटतं की तो पृथ्वी विकत घेऊ शकतो, पण खरी गोष्ट अशी आहे की पृथ्वीच त्याला जागवते.

जंगलं म्हणजे पृथ्वीची फुफ्फुसे, झाडं तिचा श्वास. आणि आपणच तो श्वास तोडतोय. आज प्रत्येकाचा श्वास कोंडतोय, कारण पृथ्वीचा श्वास कोंडला आहे. विकासाच्या आरीने, बुलडोझरने, जेसीबीने जंगले म्हणजेच आपल्या पृथ्वीची फुफ्फुसे निर्दयपणे छाटली जात आहेत. आणि हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर घडत आहे. काही काळापूर्वी आपण कोविडचा अनुभव घेतला. त्या वेळेला लोक एका एका श्वासासाठी तडफडत होते, ऑक्सिजनच्या कमतरतेने जीव गमावत होते. जग श्वासाच्या मूल्यावर हादरलं होतं.. पण त्या भीषण अनुभवाचं भान आज कुठे हरवलं? आज जंगलं नष्ट होताहेत, झाडं कोसळताहेत, डोंगरच्या डोंगर विकले जात आहेत. नदीच्या उगमाला, पक्ष्यांच्या आश्रयाला, प्राण्यांच्या घराला आपण विकासाच्या नावाने बळी देतोय. आणि हे करताना आपण विसरतो आहोत की पृथ्वीचा प्रत्येक श्वास हा आपला श्वास आहे. पण प्रश्न असा, जंगलं वाचवण्यासाठी आवाज कोण उठवतंय ?


नद्या शहराला पाणी देतात, भूमीला जीवन देतात, हवामानाला संतुलन देतात. पण आज नदी सुशोभीकरण या नावाखाली तिच्या नैसर्गिक प्रवाहावर सिमेंटचं ओझं टाकलं जातं आहे. नदीला जिवंत ठेवण्याऐवजी, तिला दगडात आणि लोखंडात बंदिस्त केलं जातं आहे. काँक्रीटच्या तटबंदीत नदीचा श्वास अडतो. नदी ही पर्यटन स्थळ नाही. ती जिवंत परिसंस्था आहे. तिच्या प्रत्येक थेंबात जीवन आहे, तिच्या प्रवाहात संतुलन आहे. म्हणून नदी सुशोभीकरणाऐवजी नदी पुनरुज्जीवन हा दृष्टिकोन आजच्या नागरी समाजाची जबाबदारी आहे. नैसर्गिक झाडांची पुनर्लागवड, सांडपाणी शुद्धीकरण, स्थानिक प्रजातींचं संरक्षण आणि नागरिकांची चेतना जागणे, हाच खरा विकास आहे. पर्यावरणाचा प्रश्न हा फक्त झाडं, नद्या आणि हवामानाचा नाही. तो सामाजिक न्यायाचा, मानवी अस्तित्वाचा आणि समतेच्या लढ्याचा प्रश्न आहे. पूर आला की सर्वात आधी वाहून जातं ते गरीबाचं घर, शेतकर्‍याचं पीक, कामगाराचं आयुष्य. शेतकर्‍यांची अवस्था पाहा. बदलते हवामान आणि अनियमित पाऊस या सगळ्यामुळे शेतकर्‍याचे जीवन अनिश्चिततेच्या कडेवरच आहे की.


आदिवासी लोकांची दुरवस्था पाहा, जंगल ही त्यांची संस्कृती. पण आज त्यांची जंगलेच त्यांच्याकडून हिरावली जात आहेत…जे मानव आणि निसर्गाच्या सहजीवनाचे प्राचीन रक्षक होते, ते आजच्याच विकासात ‘अनावश्यक’ ठरत आहेत, ही शोकांतिका आहे. समुद्रकिनार्‍यावरील लोकांना पाहा, मच्छीमारांची अस्थिर उपजीविका, या सगळ्यांनी त्यांचं जगणं एक सततच्या संघर्षात ढकललं आहे. समुद्रावर अवलंबून असलेल्या या समुदायांना पर्यावरणातील प्रत्येक बदल सरळ त्यांच्या पोटापाण्यावर परिणाम करतो. महानगरांमधील रांगणारा विकास पाहा, उद्ध्वस्त गावं आणि बुडालेल्या वस्त्या पाहा. म्हणूनच पर्यावरण हा वर्गसंघर्षाचा मुद्दा आहे. कला ही जीवनाची चेतना आहे. कला माणसाला माणूस करते. ती विवेकाला दिशा देते, आणि अंतर्मनात दृष्टी निर्माण करते. थिएटर ऑफ रेलेवन्स हे याच प्रवाहाचं प्रतीक आहे. कलेतून जीवन जगण्याचे आंदोलन. भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आजचं पाऊल संवेदनशील, विचारपूर्वक आणि निसर्गाभिमुख असायला हवं, नाहीतर उद्या उभं राहण्यासाठी जमीनच उरणार नाही! थिएटर ऑफ रेलेवन्स याच बिंदूवर भूमिका घेतं. माणसाच्या अंतर्मनात एक रोप रोवणं, विवेक जागवणं आणि कृतीला दिशा देणं हे कार्य करतं.


निसर्गाचं रक्षण म्हणजेच स्वत:चं रक्षण. माणसाच्या या विस्मरणाचा आणि त्यातून निर्माण झालेल्या विनाशाचा तीव्र दस्तऐवज उलगडण्याचे काम थिएटर ऑफ रेलेवन्स करत आहे. ‘द अदर वर्ल्ड’ हे नाटक याच वास्तवाचा कलात्मक हुंकार आहे. माणसाच्या चेतनेला जागवणारा, त्याला नदीसारख्या प्रवाही विचाराशी जोडणारा. जेव्हा मनुष्याच्या चेतनेत नदी वसते, तेव्हा तो तिला दूषित करत नाही, उलट तिच्या प्रवाहात आपल्या जगण्याला प्रवाहित करतो.


थिएटर ऑफ रेलेवन्स प्रस्तुत रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित द… अदर वर्ल्ड या नाटकाचा प्रयोग शनिवारी 24 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 11 वाजता, श्री शिवाजी नाट्यमंदिर, दादर, मुंबई येथे प्रस्तुत होणार आहे. आपल्या कलात्मक समर्पणाने या नाटकाला साकार करणारे कलाकार आहेत अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, नृपाली जोशी, प्रांजल गायकवाड, तनिष्का लोंढे.



REFERENCE- The Other World : विनाशाचे सत्य उलगडणारे ‘द अदर वर्ल्ड’

No comments:

Post a Comment