Pages

Sunday, June 30, 2019

रचनात्मक सृजनतेचे कलात्मक तरंग


आपलं महानगर 
३० जून,२०१९

मी सर्वांना सजग करत म्हणालो, निसर्ग केवळ आपल्यासाठीच नाही, तर इतर जीवजंतूही आहेत, भेगाळलेल्या जमिनीत कुठला प्राणी लपलेला असू शकतो, जरा सावध होऊन बसा. सर्व सजग व सहज अवस्थेत, माझ्या तरंगांसोबत जोडण्यासाठी आपले तरंग शोधत होते. सोनेरी संध्याकाळ आपला रंग बदलत होती...आणि हळूहळू रात्र होऊ लागली.




युसूफ मेहरअली सेंटर, पनवेल येथील अभिनय कार्यशाळेत व्यक्ती आणि कलाकार यांना जोडण्याच्या, घडवण्याच्या प्रक्रियेत आलेले अनुभव
जूनचा पहिला आठवडा…
कडक ऊन आणि गर्मीच्या दुपारनंतर संध्याकाळी, थिएटर ऑफ रेलेवन्स अभिनय कार्यशाळेत एक व्यक्ती ‘राजगती’ नाटकाच्या सकारात्मक प्रभावाने प्रभावित होऊन देशाच्या स्थितीला आपण कसे बदलू शकतो या हेतूने भेटायला आले होते. त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या आणि मी एका मागोमाग एक त्यांच्या अपेक्षांनुसार त्यांना आपली सैद्धांतिक प्रस्तावना व नियोजनाची कार्यसूची प्रस्तावित करत होतो. जवळजवळ तासभराच्या वैचारिक मंथनाने माझ्या आतील वातावरण तरंगीत होत गेले..

चर्चा संपल्यानंतर जेव्हा मी चारीबाजूला न्याहाळले त्यावेळी संध्याकाळ सावळी नाही सोनेरी झाली होती. सोनेरी वातावरण सर्वत्र पसरले होते. वातावरण बदलले होते, दमट असूनदेखील थंड वाटत होते. सोनेरी संध्याकाळ असूनही सर्व स्वच्छ दिसत होते. त्यावेळी मी समूहाला म्हणालो, चला चैतन्य अभ्यासाला जाऊया. आम्ही सारे त्वरित चैतन्य अभ्यासासाठी निघालो. इतर जीवजंतूना लक्षात घेत आम्ही शेतात पोहोचलो. जंगल आणि छोट्या टेकडीच्या कुशीत असलेले शेत धान्य कापणीनंतर तापले होते, सुकलेल्या जमिनीला भेगा पडल्या होत्या आणि जमीन पावसाची वाट पाहत आकाशाला न्याहाळत होती. सुकलेले गवतदेखील सोनेरी संध्या प्रकाशात चमकत होते. मी माझ्या पूर्ण प्रवाहात राजनैतिक चर्चेत आलेला अनुभव, समूहासोबत वाटण्यासाठी उत्साहित होतो. अनुभव सांगण्याची उत्कंठा होती.

समूहातील एका सदस्याला मी विचारले, सांग या शेतात तुला काय दिसते आहे? सदस्य माझ्या चेतनेच्या तरंगाबाहेर होता. आमची wave length जुळली नाही. समूहातील बाकी सदस्यांची चेतना जागृत झाली. असमंजस, भीती अनोखेपण हे भाव आणि कुतूहल सर्वांच्या नजरेत होते. माझ्या कलात्मक तरंगांना समूहातील सहभागींसोबत जोडता न आल्यामुळे माझ्या तरंगीत आवेगावर पाणी फेरले गेले.


आकाशात वीज चमकताना जाणवली आणि मी समूहाला म्हणालो, चला परत जाऊया समूहाच्या सदस्यांनी धैर्य एकवटून थोडावेळ थांबण्याचा आग्रह केला, मी मौन स्वीकृती दिली आणि आम्ही शेतामध्ये जंगलाच्या दिशेने पुढे चालू लागलो. समूह स्वतःला सांभाळत, कुजबूजत चालला होता. मी माझ्या उर्जेला परिवारासोबत फोनवर संवाद करून परावर्तित केले. पाच दहा मिनिटांनंतर मी पुन्हा समूहासोबत जोडलो गेलो, तरंगित आवेग (मनाची एक स्थिती) कायम होता; पण मन शांत धीरगंभीर होऊन संप्रेषण यंत्रांच्या शोधात होते. मी स्वतःला निसर्गात सोडले आणि आम्ही सारे शेतात बसलो.

मी सर्वांना सजग करत म्हणालो, निसर्ग केवळ आपल्यासाठीच नाही, तर इतर जीवजंतूही आहेत, भेगाळलेल्या जमिनीत कुठला प्राणी लपलेला असू शकतो, जरा सावध होऊन बसा. सर्व सजग व सहज अवस्थेत, माझ्या तरंगांसोबत जोडण्यासाठी आपले तरंग शोधत होते. सोनेरी संध्याकाळ आपला रंग बदलत होती…आणि हळूहळू रात्र होऊ लागली. वातावरण दमट होते तरी गार वाटत होते… वाढत्या अंधारात समूहातील एक सदस्य उत्साहाने ओरडली काजवा, कुतूहलाच्या तरंगांनी संपूर्ण समूहाला घेरले..क्षणार्धातच आमच्या चहूबाजूंच्या झाडांवर असंख्य काजवे लखलखत होते. समूहातील सदस्यांच्या अपेक्षा आणि स्वप्नेदेखील त्यांच्या मनात काजव्यांप्रमाणे चमकू लागले. हजारो काजवे बाहेर तर हजारो इच्छा काजव्यांप्रमाणे सर्वांच्या आत झगमगत होत्या. या इच्छांची चमक तरंगीत होऊन संपूर्ण समूहाच्या कलात्मक तरंगांना चमकवीत होती !

येथे एक पैलू हा आहे की, चार वर्षांपूर्वी, नाटक अनहद नाद नाटकाच्या पहिल्या प्रस्तुतीआधी
काजवे एका झाडावर दिसले आणि आज चार वर्षांनंतर .. आश्चर्यकारक .. अलौकिक अनुभव…

create, radiate and resonate
ज्ञान आणि अज्ञान (मूर्खपणा) चा संघर्ष, व्यक्तिच्या संप्रेषण क्षमतेची मर्यादा, व्यक्ती होण्याच्या अधिकाराचा सन्मान, कलात्मक सिध्दी आणि अपेक्षा, कलाकार आणि त्याची कलेतून स्वतःला कोरून आकार देण्याची प्रतिबद्धता. या सगळ्यांमध्ये तरंगणार्‍या आणि जूनच्या उष्मीत वातावरणात होरपळून जाणार्‍या कार्यशाळेत व्यक्ती आणि कलाकाराच्या आयमांना मंथन करण्याची प्रकिया सुरू होती. कलाकाराकडून सतत आपल्या व्यक्तितल्या खोटेपणाला वेगवेगळ्या अभिनयाच्या पद्धतीने लपवण्याचा प्रयत्न सुरू होता. व्यक्तितल्या कमजोरीला लपवण्याचे असफल प्रयत्न. प्रत्येक प्रयत्न ना व्यक्तीला स्पर्श करत होता आणि ना ही कलाकाराचा विश्वास पक्का करत होता.

यामध्येच कार्यशाळेतील दोन दिवस निघून गेले. कलाकार रंगमंचाच्या मध्यभागी, मी समोर बाकी सहभागींसोबत प्रेक्षकांसारखा बसलो आहे… कलेच्या नावाखाली पाखंड होत आहे हे बघून माझा राग प्रचंड वाढत होता. फक्त एक क्षण धैर्याने मला सांभाळून ठेवले होते. मनात येत होतं की मी या कलाकाराचे दगडाप्रमाणे तुकडे तुकडे करून टाकू, खूप प्रहार करू, मातीसारखं एक एक कण वेगळा करून, त्या मातीला रगडू आणि मग त्यात सत्वाचे अमृत मिसळून त्याला एकरूप करू आणि त्यातून एका सात्विक व्यक्ती आणि कलाकाराला आकार देऊ. हे मनन करता करता रागाने माझ्या पूर्ण मेंदूला व्यापले आणि अचानक निद्रावस्था मला माझ्या अर्धचैतन्य अवस्थेत घेऊन गेली. मी बसल्या बसल्या स्वतःच्या जागेवर थोड्या वेळासाठी झोपून गेलो.

दुसर्‍याच क्षणी कलात्मक तरंगातल्या विश्वाने मला सामावून घेतले. मंचावर कलाकार स्तब्ध, शिथिल आणि मूढ, जड अवस्थेत… अगदी मंचाच्या मध्य भागी… माझ्यातल्या तरंग विश्वाने त्याला स्पर्श केले आणि जे मी रागाच्या मानसिकतेत विचार करत होतो.. त्या कल्पनेला कलाकार परफॉर्म करू लागला. त्याने मंचाला आपल्या पाच प्रतिमाप्रमाणे पाच भागांत विभागले. एक अभिनय, चित्रकार, गायक, व्यक्ती आणि साधना स्थळ. प्रत्येक भागाची प्रतिमा म्हणजे छबीला उचलले.. एकत्र ठेवले त्यांना तोडले, प्रहार केला आणि एक एक कण वेगळा केला, मग त्यात पाणी मिसळून त्याला एकरूप केले.. त्या मिश्रणाला चाकावर ठेवले आणि त्याचे एक मडके बनवले. त्या मडक्याला उचलून मंचाच्या मध्यभागी आणले आणि आगीवर ठेवले.


स्वतःची ध्यान साधना करत आपल्या व्यक्तीतील सद्विवेक बुद्धीच्या भट्टीत तापवले. मडकं मजबूत झाल्यावर म्हणजेच व्यक्तीच्या विवेकाचा पाया रचून त्यावर आपल्या व्यक्तित्वाला घडवत कलाकाराने कला सत्वातून प्रेक्षकांना अभिभूत केले. जेव्हा माझी कलात्मक तरंग कलाकाराला स्पर्श करत होती तेव्हा मी मध्ये मध्ये डोळे उघडून पाहत होतो की, कलाकार मला बघण्यात गुंग तर नाही झाला.. पण कलाकाराने कलात्मक सिद्धीला जगत कलात्मक आनंदाने आपल्या विखंडित झालेल्या व्यक्ती आणि कलाकाराच्या दोन टोकांना जोडले होते. प्रस्तुतीनंतर सर्व सहभागींनी आपला अभिप्राय दिला. प्रत्येकाला connection जाणवले. मी सगळ्यांना विचारले की हे तर तुम्ही पाहिले.. पण ते सांगा जे प्रस्तुती बघताना तुमच्या आत घडत होते.. म्हणजे तुम्ही काय पाहिले ते वेगळे.. बघताना तुम्हाला काय होत होतं ते वेगळं.. मग मी प्रस्तुती बघताना माझ्या आत जे घडत होते ते सर्वांना सांगितले.. माझा प्रवास, कलात्मक तरंग भावाची हुबेहूब जाणीव आणि त्यापासून उत्प्रेरित होण्याची प्रकिया व त्याचा पुरावा कलाकाराने जेव्हा सांगितला, तेव्हा सगळे अवाक झाले. कला साधनेत चैतन्य-अर्धचैतन्याच्या कलात्मक तरंग आणि त्याचे सृजन, विकिरण आणि गुंजन …सृजनकार म्हणून create, radiate and resonate चे हे अद्भूत अनुभव अनुभवले !


-मंजुल भारद्वाज (रंगचिंतक व तत्वज्ञ)




Tuesday, June 25, 2019

अंतर्नादचा उन्मुक्त हुंकार…

आपलं महानगर 
२३ जून,२०१९


नाटकात किंवा कलेत ही ताकद असते की माणसाच्या व्यक्तिगत अनुभवाला सकारात्मक दिशा देण्यासाठी आणि त्याला उन्मुक्त करण्यासाठी, माणसात असलेल्या कलेला नाटक जिवंत करते. माणूस हा शरीर आहे तर कलाकार त्यातला प्राण! हा कलाकार नाटकातल्या पात्राची बौध्दिकता समजून, स्वतःच्या कलात्मक सत्वाला प्राप्त करून, व्यक्तीला कलेशी जोडतो आणि दोघांचाही स्तर वाढवतो.



कलाकारांना कुठलीही कृती करण्यासाठी प्रेरणा कुठून मिळते?
प्रेरणा मिळते ती विचारांनी, विचार संदर्भ शोधतात, संदर्भ शोध प्रक्रिया वाढीस नेतात आणि स्व-अस्तित्वाची निर्मिती होते. कलाकारामध्ये अस्तित्व निर्माण करण्याची दृष्टी जोपर्यंत सृजित होत नाही, तोपर्यंत प्रत्येक संदर्भाशी तो नातं कसं जोडेल..? आणि हे नातं जुळले नाही तर मग नाटकातल्या पात्राची बौध्दिकता, त्याची कलात्मक उंची, वैचारिक प्रतिबद्धता कशी गाठणार? अभिनयासाठी हे तीन पैलू अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात :

1. मी स्वतः कोण आहे? 
2. माझ्या पात्राची बौद्धिक पातळी आणि कलात्मक उंची काय आहे ? 
3. दृष्टी संपन्न अभिनय

कला ही निरंतर शोध प्रक्रिया आहे, जेव्हा कलाकार एकाच अनुभवाला, संदर्भाला घेऊन रंगमंचावर येतो आणि त्याच अनुभवाच्या जोरावर अनेक प्रयोगात आपली भूमिका पार पाडत असतो, तेव्हा त्याला कलाकार म्हणता येणार नाही, तो एक मेकॅनाईझड (स्टाईल्ड) अ‍ॅक्टर आहे, ज्याला तीच वातावरण निर्मिती लागते, त्याच अनुभवाचा आधार हवा असतो, तेच स्टाईल्स हवे असतात आणि त्याच टाळ्यांच्या गडगडाटीची भूक असते. खरंतर कलाकार म्हणजे क्षणोक्षणी होणारी सृजना जी कुठल्याच ठरलेल्या साच्यात बसत नाही. कधी आपण हा विचार करतो का, की या टाळ्यांच्या कल्लोळापलीकडे कलाकाराचा स्वतःचा एक आवाज आहे, जो ऐकण्याऐवजी दरवेळी दुर्लक्षित होत असतो?


असं म्हटलं जातं की कलाकाराला आवाज असतो. तो त्या आवाजाने वेगवेगळी पात्र, भूमिका साकारतो. लेखकाचा विचार आपल्या अभिनय कौशल्याने, आवाजाच्या माध्यमाने त्या प्रत्येक विचाराला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. दृश्य, सदृश्य, अदृश्य अशा कैक विचारांची किमया आवाजाच्या तरंगांतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत, अखंड वातावरणात चैतन्य निर्माण करून कलात्मकतेचा उदय करतो. मी आतापर्यंत रंगभूमीवर जेवढी नाटकं पाहिली किंवा केली. त्या प्रत्येक नाटकांमध्ये मी ध्वनी यंत्रणा, संगीत संयोजन, आवाचा चढ-उतार, आवाजाने प्रेक्षकांना होल्ड करणे हे सगळे महत्त्वाचे पैलू अनुभवत आले; पण या सर्व प्रवासात माझी एक बाजू सुटत होती ती म्हणजे स्वतःच्या आतला आवाज ऐकण्याची.

स्वतःचा आवाज ऐकणे म्हणजे नेमकं काय? जिवंत असल्याची निशाणी.. स्वतःशी संवाद करण्याची सुरुवात.. खरेपणा आणि माणुसकीला रुजवण्याची प्रक्रिया.. संवेदना आणि सहवेदनांची जाणीव.. या सगळ्या मानवी मूल्यांना मुळापासून नष्ट करण्याचे षड्यंत्र आज बाजारीकरण रचत आहे. फेम आणि ग्लॅमरच्या चौकटीत अडकून कलाकार कठपुतली होत आहेत. दुसर्‍यांच्या इशार्‍यावर केवळ शारीरिक क्रिया करणे, ज्यात स्वतःच्या मेंदूचा, विचारांचा, तत्वांचा काहीच उपयोग होणार नाही असे षड्यंत्र रचले जात आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी कलाकाराने साधलेली सिद्धी त्याच्या हातून सुटत चालली आहे, याची कलाकारांना अजून जाणीवही होत नाही.

रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित दिग्दर्शित नाटक अनहद नाद – अनहर्ड साऊंड्स ऑफ युनिव्हर्स मधल्या अपनी अनसूनी आवाज सुनो या गाण्यामुळे मला स्व-अस्तित्वाची जाणीव झाली. अशा चंदेरी दुनियेत जिथे दिखाव्याला महत्त्व दिले जाते, जिथे कला किंवा नाटक म्हणजे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जाते, जिथे रंगभूमीवर मुखवटा चढवून केवळ प्रसिद्धीसाठी कलेचा र्‍हास होत आहे, तिथे या नाट्य प्रक्रियेतून मी स्वतःचे सत्व साधून, कलेला आणि कलाकारांना उन्मुक्त करत, कलात्मक सत्व जपत आहे. आणि या कलात्मक सत्वाने आयुष्य जगण्याचे सौंदर्य वाढवत आहे.

रंगकर्म एक साधना आहे आणि अभिनय म्हणजे अभिव्यक्तीची निरंतर असणारी शोध प्रक्रिया. कलाकाराची साधना हीच त्याची खरी सिद्धी आहे आणि हीच प्रक्रिया आपोआप प्रसिद्धीही मिळवून देते. एक अशी ओळख जी कायमस्वरूपी आपली राहते. अपनी अनसूनी आवाज सुनो या गाण्याने मला, माझी एक जगावेगळी ओळख मिळवून दिली. हे गाणं गात असताना जशी मी स्वतःच्या आत जाऊ लागते तसा माझा स्वतःचा आत्मिकशोध सुरू होतो. प्रेक्षक जेव्हा हे गाणं ऐकतात तेव्हा त्यांना ही या आत्मशोधाची प्रचिती होते आणि प्रत्येक जण स्वतःचा आवाज ऐकण्यासाठी स्वयंप्रेरित होतो. कलाकार रंगभूमीवर अनेक पात्र साकारतो; पण तो आयुष्यात व्यक्ती म्हणून कोण आहे हे जोपर्यंत त्याला माहीत नसेल तोपर्यंत तो उत्तम कलाकार होऊच शकत नाही. यासाठी आत्मशोध ही प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरते. या नाटकाने माझ्यातल्या कलाकाराला तर बहरलेच सोबत माझ्यातल्या व्यक्तीला आकार देण्याची शक्तीही मला दिली.

नाटकात किंवा कलेत ही ताकद असते की माणसाच्या व्यक्तिगत अनुभवाला सकारात्मक दिशा देण्यासाठी आणि त्याला उन्मुक्त करण्यासाठी, माणसात असलेल्या कलेला नाटक जिवंत करते. माणूस हा शरीर आहे तर कलाकार त्यातला प्राण! हा कलाकार नाटकातल्या पात्राची बौध्दिकता समजून, स्वतःच्या कलात्मक सत्वाला प्राप्त करून, व्यक्तीला कलेशी जोडतो आणि दोघांचाही स्तर वाढवतो. अशी प्रक्रिया व्यक्ती आणि कलाकार दोघांना समृद्ध करते. आणि थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांतानुसार कलाकार आणि व्यक्ती हे दोघेही दोन वेगळ्या भूमिका असल्या, यांच्या जगण्याचा मार्ग जरी वेगळा असला, यांचा प्रवास ही वेगळा असला, तरीही हे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात, कोलॅबोरेट करतात. कारण कलाकार आपल्या सत्वातून कलेला समृद्ध करत असतो आणि व्यक्ती आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला उन्मुक्तपणे जगत असतो.

जीवन ही जगण्याची एक कला आहे. जसं कलेला विकलं जाऊ शकत नाही तसेच आयुष्यातल्या अनमोल अनुभवांना विकत घेतले जाऊ शकत नाही. या नाटकातून मी हेच शिकले की आपले आयुष्य हे नफा तोटा लिहिण्याची बॅलन्सशीट नाही आहे. एक कलाकार म्हणून आपल्या भावनांना वैचारिक दृष्टीकोन देऊन रंगमंचावर अभिव्यक्त होणे आणि एक व्यक्ती म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण उन्मुक्तपणे जगणे हीच माझी कला आणि जीवनाप्रति निष्ठा आहे.

अपनी अनसुनी आवाज सुनो 
– मंजुल भारद्वाज

अपनी, सबकी और सारे ब्रह्मांड की 
अनसुनी आवाज सुनो !

मानवीय विष को पीना ही 
कला का ध्येय है

संवेदना है उत्पाद नहीं 
कला का अब व्यापार नहीं

साधना है, कारोबार नहीं 
सुनो सुनो आवाज़ सुनो

अपनी अनसुनी आवाज़ सुनो 
अपनी, सबकी और सारे ब्रह्मांड की आवाज़ सुनो !

- कोमल खामकर – रंगकर्मी



Sunday, June 16, 2019

अभिनय एक आत्मचिंतन…

आपलं महानगर 

१६ जून  २०१९



प्रामुख्याने नाटकामध्येही नाटकाची संहिता किंवा संकल्पनेऐवजी नाटकाच्या तांत्रिक बाजूंवर खूप भर दिला जातो. म्हणूनच अभिनय हा गिमिकमध्ये अडकून आहे किंवा पाश्चिमात्य शैलीत अडकलेला आहे. थिएटर ऑफ रेलवन्सच्या नाट्य प्रक्रियेत समजले की, अभिनय बाहेरील स्रोतांवर अवलंबून नसतो, तर अभिनय एक मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे, जी एक व्यक्ती म्हणून स्वतःलाच स्वतःसोबत करावी लागते.

आत्मचिंतन ते अभिव्यक्ती आणि अभिव्यक्तीतून आत्मशोध. आत्मशोधातून आत्मप्रेरणा…हा प्रवास मी केला, जगला आणि अनुभवला..या आत्मशोधासाठी मला माझ्या अभिनय प्रक्रियेने खूप प्रेरणा दिली. प्रेरणा मिळते ती तत्वाने, चिंतनाने, संकल्पनेने. संकल्पनेतून संदर्भाचा शोध वाढीस लागतो.

शोधातून आत्मशोध….. आत्म म्हणजे ‘मी’..मी स्वतःला ओळखते का? मी या जगात का आहे? माझ्या जगण्याचे ध्येय काय? या प्रश्नांतून विचारांच्या प्रवासाला सुरुवात झाली..आणि समजलं की आयुष्याच्या सर्व गोष्टींमधून वाट काढत स्वतःला समजण्याची यात्रा … म्हणजे आत्मशोध… अभिनय आणि आत्मशोध यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे…


तो असा की कलाकार नेहमी स्वत:ला सतत आपल्या कलेतून नव्यानं शोधत असतो… कोणतीही कला आत्मशोधाला प्रेरित करते…नाट्यकलेच्या माध्यमाने अभिनेता, अभिनेत्री अभिनयातून अभिव्यक्त होतात…अभिव्यक्त होणे म्हणजे स्वतःच्या मनातील भावना, विचार जसे आहेत तसे मांडणे की त्यांना दिशा देऊन अभिव्यक्त करणे, यासाठी आत्मशोध !
नाट्यकला माझ्या अभिव्यक्तीचे माध्यम ठरली…

नाटकाची आवड कॉलेजमध्ये शिकत असताना जडली…एकांकिका करता करता कळले की आपल्याला नाटकातील अभिनयही बर्‍यापैकी जमतोय…सुरुवातीला नाटकाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन तात्कालिक आवड किंवा हौस म्हणूनच होता. हे माझ्याच बाबतीत आहे असे नाही, तर कलाकार होऊ इच्छिणार्‍या बहुतांश व्यक्तींकडून मी हे असेच ऐकले आहे. तर मुद्दा हा की, एकांकिकामधून, नाटकांतून काम करताना..दिग्दर्शक म्हणेल ते करायचे. दिग्दर्शक सांगायचा की दोन पावले चाल..मग मागे वळून डायलॉग बोल, ती जागा घे, लाईट घे.. पण त्याचा संदर्भ काय हे नाही सांगायचा…मी सांगतो म्हणून कर.

स्थिर भाव, रोमांच भाव, आक्रोश आणि एक्साईटमेंट हे सर्व दिग्दर्शक सांगायचा…शून्यात बघत सोलोलोकी बोलायची…. एका श्वासात संवाद बोलायचा.. दोन पावले चालून असे वळायचे..मग फुटेज घे….मग मध्येच पंच टाकायचा, आवाजाचा थ्रो शेवटच्या रांगेपर्यंत जायला हवा आणि पात्र दाखविण्यासाठी तशी वेशभूषा करायची…इत्यादी…इत्यादी ..हे करता करता अशीच माझीही समज झाली की हाच अभिनय आहे.

थिएटर ऑफ रेलेवन्स या नाट्य प्रक्रियेत येऊन समजले की, नाटक रंगमंचावर येण्याआधी मेंदूत जन्म घेते. मंजुल भारद्वाज लिखित – दिग्दर्शित छेडछाड क्यों? नाटकाची सुरुवात झाली तेव्हा कळलं की अभिनय आणि मेंदू यांचा संबंध आहे…अभिनय म्हणजे विचार …अभिनय म्हणजे थिंकिंग प्रोसेस…हे समजले.

तथाकथित रंगभूमीवरील दिग्दर्शक सगळ्या तांत्रिक बाजू सांगून कलाकाराला नक्कीच कुशल करतो; पण कलाकारासाठी महत्त्वाची आहे ती त्याच्या मेंदूची मशागत ती कुठला दिग्दर्शक करतो? किंवा ही बाजू समजणारे दिग्दर्शक मोजकेच असतात…

प्रामुख्याने नाटकामध्येही नाटकाची संहिता किंवा संकल्पनेऐवजी नाटकाच्या तांत्रिक बाजूंवर खूप भर दिला जातो. म्हणूनच अभिनय हा गिमिकमध्ये अडकून आहे किंवा पाश्चिमात्य शैलीत अडकलेला आहे. थिएटर ऑफ रेलेवन्सच्या नाट्य प्रक्रियेत समजले की, अभिनय बाहेरील स्रोतांवर अवलंबून नसतो, तर अभिनय एक मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे, जी एक व्यक्ती म्हणून स्वतःलाच स्वतःसोबत करावी लागते. म्हणून अभिनयासाठी व्यक्ती सक्षम असणे आवश्यक आहे.

नाटक ही एक मनोवैज्ञानिक कला आहे. ती जेवढी सांघिक तेवढीच वैयक्तिक प्रक्रिया आहे. सहसा आपण पाहतो की, नाटकात एक कलाकार म्हणून माझा रोल, माझे कॅरॅक्टर, माझे संवाद इथपर्यंतच कलाकार मर्यादित असतात. पण थिएटर ऑफ रेलेवन्सच्या प्रक्रियेत केवळ संवाद आणि रोलपर्यंत मर्यादित न राहता…आम्ही कलाकार पूर्ण नाटकाच्या संकल्पनेला आपलंसं करण्यासाठी नाटकाच्या सर्व दृश्यांना इन्डिव्हिज्युअली परफॉर्म करतो. जेणेकरून मला माझ्यासोबत, माझ्या सहकलाकारांचा नाटकातील प्रवास कळतो व त्यातून एक कलाकार म्हणून अभिनयाची व्यापकता वाढते.

अभिनयासाठी आवश्यक असणारा अजून एक पैलू म्हणजे निरीक्षण.. तथाकथित रंगभूमीवर नाटक करत असताना सांगितले जाते की निरीक्षण करा पात्राचे..वस्तूूूचे आणि तशीच हुबेहूब नक्कल करा; पण थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य प्रक्रियेत समजले की अभिनयासाठी उपयुक्त असलेला निरीक्षण हा आयाम केवळ निरीक्षण करून नक्कल करण्याइतपतच न राहता केलेल्या निरीक्षणाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे…ज्याने पात्राची मनोभूमिका कळते. निरीक्षण केलेली घटना, वस्तू किंवा व्यक्ती, कार्य यांचा माझ्याशी संबंध काय? त्याकडे पाहण्याची माझी दृष्टी काय? याचे विश्लेषण आधी केले जाते. नाटकात एक पात्र कलाकार रंगवत असतो, हे पात्र समाजाच्या घटकातून आलेले असले तरी एक व्यक्ती म्हणून माझ्या शरीरात त्याला जागा द्यायची आहे, म्हणजे एक पात्र त्याची विचारसरणी, त्याची जीवनशैली, त्याचे भाव, त्याची अंगयष्टी याला स्वतःच्या आत उतरवण्याची मनोवैज्ञानिक प्रक्रिया मला करण्यासाठी आधी स्वतःला जाणणे महत्त्वाचे आहे. म्हणून बाहेरील निरीक्षणाआधी आत्मनिरीक्षण-आत्म अवलोकन करणे आवश्यक आहे.

पारंपरिक अभिनय शैलीत रंगभूमीवरील मातब्बर रंगकर्मी स्वतःला 15-15 दिवस एका खोलीत बंद करून घेत होते, आणि खोलीबाहेर पडून एकाच भावमुद्रेत राहत होते. त्यांनी रंगभूमीवर अभिनयाचा एक मानदंड स्थापित केला आहे. इथे माझा प्रश्न आहे की, जडत्व तत्व आहे का? हे जडत्व म्हणजे चरित्र आहे का? की जडत्वाने प्रेक्षकांना केवळ एक भाव दाखवणे.

पारंपरिक अभिनय शैलीतील हाच वरवरचा भाव संमोहनापर्यंत घेऊन जातो किंवा हा भाव तत्कालीक संमोहित करतो. पण मेंदूला भेदत नाहीत. असे रंगकर्मी अभिनय भावमुद्रा करून तत्काल प्रभाव टाकतात आणि थिएटर ऑफ रेलेवन्सची अभिनय प्रक्रिया मंथन विवेचनेकरिता चैन रिअ‍ॅक्शन सुरू करते.

कलाकृती कोणतीही असो, कलाकृतीमधील समग्रता व जाणीव त्या कलाकृतीला व्यक्ती व काळासोबत जोडते आणि थिएटर ऑफ रेलेवन्स ही जाणीवच प्रत्येकात निर्माण करते. जाणीव माणुसकीची… जाणीव स्वतःच्या असण्याची. जाणिवेतून तत्वाची मांडणी होते. या तत्वाने रंगभूमीवर जेव्हा नाटक होते तेव्हा ते नाटक निव्वळ रंजनात्मक न राहता चेतनात्मक होते. या चेतनेला जागृत करण्यासाठी ‘दृष्टी संपन्न अभिनय’ अभिनय प्रक्रियेचा मुख्य भाग! म्हणजे पर्पज याला आपण हेतू, ध्येय असे म्हणतो, तर माझ्या अभिनयाला हेतू असणे, ध्येयं असणे आवश्यक आहे.

सहसा अभिनेत्री, अभिनेता यांचा, अभिनयातून मनोरंजन कसे होईल याकडे कल असतो. त्यामुळे असे कलाकारही प्रासंगिक विनोद, अंगिक हालचाली, टाइमिंग या स्वतःच्या कौशल्यांवर भर देतात. मान्य ही कौशल्य ही उपयुक्त, पण केवळ या कौशल्याने अभिनय होत नाही.

नाटकात अभिनयाची पराकाष्ठा चिंतन व अनुभवांतून गाठली जाते. म्हणून अभिनयात चिंतन प्रक्रिया ही शारीरिक हालचाली किंवा चेहर्‍याचे व्यंगात्मक भाव निर्माण करण्यापलीकडची आहे.

थिएटर ऑफ रेलेवन्सच्या अभिनय प्रक्रियेत अभिनेत्री व अभिनेत्याच्या शरीराला (बॉडी) महत्त्व आहे…कलाकाराच्या शरीराला काय वेगवेगळे आकार आहेत, शेप आहेत. यातून अभिनयाचा एक नवीन पैलू या प्रक्रियेत समजला. कलात्मक आकृती, आखीव-रेखीव रचना, मुद्रा यांद्वारे अभिव्यक्त होऊन संहिता (तत्व) आणि शरीराचा समन्वय साधणे हे अभिनयाचे सौंदर्यशास्त्र आहे.

अभिनेता, अभिनेत्री सतत स्वतःच्या अभिनयातून एक एक साचा निर्माण करत असतात आणि तो तोडतातही म्हणून, माझ्यासाठी अभिनय म्हणजे लर्न आणि अनलर्न करण्याची प्रक्रिया आहे..

इथे एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की, मानवीमूल्यांना संवेदनशील दृष्टीने पाहणे कलाकारासाठी अनिवार्य आहे. या दृष्टीशिवाय कलाकाराचा अभिनय फक्त एक दिखावा आहे. यासाठी अभिनय हा रंगमंचावर करायचा, जीवनात नाही..जीवन प्रवाही आहे ते जगायचे आणि नाटकातून जीवन जगण्याचा दृष्टीकोन द्यायचा हे अभिनयाचे- अभिव्यक्तीचे मूल्य थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य तत्वाने माझ्या आत रुजवले.
-(सायली पावसकर – रंगकर्मी)

Saturday, June 15, 2019

Sunday, June 9, 2019

कलात्मक रूहें!


आपलं महानगर 

९ जून  २०१९



जागतिकीकरण प्रत्येक मूल्य नष्ट करत आहे. परंतु, येथे आपण फक्त एक सामान्य माणूस नाही, कलात्मक कौशल्याने कुशल आहात. आपल्या स्वत:च्या या ताकदीवर टिकून राहा आणि ओळख कायम ठेवून प्रस्ताव स्वीकारा. रांगत नव्हे, तर पाठीचा कणा ताठ ठेवून आपल्या ‘कलात्मक मूल्यांवर’ टिकून राहा. प्रारंभिक धक्का दिल्यानंतरही बाजार आपले मत ऐकत आहे. बस सुरुवातीच्या धक्क्यांमध्ये आपली पतवार धरून ठेवायची आहे.

समर्पक कलाकार आहे. कलेसाठी जीवन समर्पित केले आहे. माझे शरीर लय, ताल घेऊन एका पात्राचा उपयुक्त आकार घेण्यास सदैव तत्पर आहे. माझ्या आवाजाला सतत अभ्यासाने पैलू पाडले आहे. अभिनय करताना चारित्र्याचा आवाज धारण करण्यामध्ये पारंगत आहे. भावमुद्रांना साधनेतून साध्य केले आहे. प्रत्येक पात्राच्या भावाला जिवंत करण्यास प्रवीण आहे. विचारांचा साधक आहे. तत्वाला एका व्यक्तिगत जीवनात जगतो. कलेची संकल्पना, त्याच्या निर्मितीच्या मूळ लक्ष्यापासून कधीच ध्यान भरकटवत नाही.. आणि म्हणूनच ‘कला ती जी मनुष्याला मनुष्य बनवते’ या मूळ ध्येयाला गाठण्यासाठी प्रतिबद्ध आहे किंवा असं म्हणायला हरकत नाही की हठयोगमध्ये पारंगत आहे. चेतनेच्या चैतन्य ब्रह्म सृजन स्वरूपामध्ये सिद्धहस्त सृजनकार आहे.

कलेची समर्पकता मला आध्यात्मिक संतुष्टी देते. पण माझ्या आसपासच्या सांसारिक गोष्टी मला प्रत्येक क्षणी निरर्थक करतात. समाज आणि बाजार कलेची एक विकली जाणारी छबी विकतात. नाचणे, गाणे, हतप्रभ करणे, भावविभोर करणे, हिंसेतून वीररस भरणे, गलथान पद्धतीने हसणे, अतिभावूक होऊन रडवणार्‍या कुशल, तार्किक विचारशून्य शरीरांना बाजार कलाकार म्हणून प्रस्थापित करतो आणि काही लोक जे विचार करतात त्यांना खरेदी करून नफा कमवत आहे. कलेच्या नावावर जगणार्‍या शरीरांचे पोट इतके वाढवतो की, ते स्टारपासून सुपरस्टार, सदीचा महानायक ते सुपर से उपर आणि फैंटाबुलस फैनटेसीपर्यंत काय काय होतात; पण त्यांच्या मुखातून हे कधी ऐकले नाही की माझे पोट भरले आहे. कारण बाजार गरजा पूर्ण करण्यासाठी नाही तर, लालसा वाढवण्यासाठी असतो.

यू डोंट नीड इट, बट यू वॉण्ट टू हॅव इट!
खरेदी आणि विक्रीच्या या काळात कलाकाराने काय करावे? कलाकाराने त्याच्या ‘व्यक्तिमत्वाची मूल्य स्वच्छ करत त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि दृष्टीकोन वाढवणे अनिवार्य आहे. केवळ भावविश्वात विहार करण्याऐवजी, प्रखर बुद्धीने कलेच्या नावाने येणार्‍या प्रस्तावांवर विचार करण्याची आवश्यकता आहे. हा देवाणघेवाणीचा काळ आहे. कलाकाराला प्रत्येक परिस्थितीत आपली ‘ओळख’ जिवंत ठेवावी लागणार आहे. ‘ओळखी’ला प्रसिद्धी हा पर्याय नाही. ओळख म्हणजे आपले ‘कलात्मक मूल्य’ आणि प्रसिद्धी म्हणजे आपल्या कलात्मक प्रतिभेची जन स्वीकार्यता. म्हणून ओळख म्हणजे ‘कलात्मक मूल्य’ व प्रसिद्धी म्हणजे कलात्मक प्रतिभेची जन स्वीकृती. जागतिकीकरण प्रत्येक मूल्य नष्ट करत आहे. परंतु, येथे आपण फक्त एक सामान्य माणूस नाही, कलात्मक कौशल्याने कुशल आहात. आपल्या स्वत:च्या या ताकदीवर टिकून राहा आणि ओळख कायम ठेवून प्रस्ताव स्वीकारा. रांगत नव्हे, तर पाठीचा कणा ताठ ठेवून आपल्या ‘कलात्मक मूल्यांवर’ टिकून राहा … प्रारंभिक धक्का दिल्यानंतरही बाजार आपले मत ऐकत आहे. बस सुरुवातीच्या धक्क्यांमध्ये आपली पतवार धरून ठेवायची आहे.


परंतु, बाजार आपल्या ‘कलात्मक मूल्यांचा’ सतत विध्वंस करत आहे. बाजाराला कलेची नाही वस्तूची गरज आहे. बाजार शरीराच्या मादकतेला भाववस्तू बनवून नफा मिळवत आहे. म्हणूनच अर्थच्या नावावरून आपल्याला भ्रमित केले जाते. सुरुवातीला पैसे नाही देत नंतर भरपूर पैसे देतात. या पैशांची चमक आपल्या दृष्टीस आंधळे करते. याच्या पलीकडे जाऊन स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःला या ओळीने प्रेरित करा. ‘एक माशी गुळाच्या ढेपेवर बसली, त्या ढेपेलाच ती चिटकली, गूळ वितळला ती त्यात रुतली, फसली आणि तिला स्वतःचा जीव गमवावा लागला’.

प्रसिद्धी नाही मिळाली तर त्याची खंत आणि मिळाली तर जगणे बेहाल.. म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, की प्रसिद्धी ही तुमच्या कलात्मक कौशल्यांना मिळाली आहे आणि तुमच्या कलात्मक कौशल्यांचा आधार तुमची कलात्मक मूल्ये असतात. आपल्या यशाला वैयक्तिक यशापर्यंत मर्यादित करू नका, उलट आपली ‘कलात्मक मूल्ये’ अर्पित करून, कलेच्या मूळ ध्येयाला साध्य करणार्‍या साधनेच्या रुपात पहा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला ‘व्यक्तिनिष्ठ’ करण्याऐवजी ‘सार्वभौमिक’ स्वरूपात आपल्या जीवनाला समर्पित करा.

कलात्मक रूहें
समाधान के शोध में ,

उछलती, मचलती, डूबती

भावनाओं की तड़पती बहती धारा,

अपने तत्व की तलाश में

उलझता सुलझता मन

उष्णता, शीतलता के बीच

झूमती, डोलती काया

अपने होने, ना होने के समर में

अंदर, बाहर झांकते बिम्ब

चेतना के सूर्य का आत्मोदय

तत्व के यथार्थ को साधती

सिद्धहस्त करती सिद्धियाँ

अपने नाद को अनाहद में

परिवर्तित करती स्वरलहरियां

अपने कलात्मक सत्व को सुनती

गाती, गुनगुनाती कलात्मक रूहें !

-मंजुल भारद्वाज ( रंगचिंतक व तत्वज्ञ )

Sunday, June 2, 2019

अभिनयाचा एक मुख्य पैलू : स्पर्श

आपलं महानगर 
२ जून  २०१९


हाच तो "स्पर्श" जो मायेचा, विश्वासाचा, आपलेपणाचा, आपुलकीचा, सद्विवेकाचा, चेतना निर्माण करणारा, अंगावर रोमांच उभे करणारा असतो, जी संवेदना ‘कला’च निर्माण करू शकते. हा स्पर्श ‘माणुसकीचा’ असतो. जे हे रोमांच आपण रंगमंचावर अनुभवतो तेच आपल्या वैयक्तिक आयुष्यात, प्रत्येक नात्यात अनुभवण्यास मिळाले तर जीवन किती सुंदर होऊन जाते! हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय समजणार नाही.


मानवीय संवेदनांमधील सर्वात सुंदर आणि मोहक भावना म्हणजे स्पर्श!
या स्पर्शाने कितीतरी आयुष्ये बहरली, मोहरली, फळास आली, सार्थकी लागली.
स्पर्श, मग तो त्वचेचा असो वा नजरेचा
भावनिक असो वा चेतनेचा…

स्पर्श ही एक अशी भावना आहे, जी अनुभवण्यासाठी उत्सुकता असते, मात्र त्याविषयी फारसे खुलून बोलले जात नाही. व्यावहारिक जीवनात विविध स्पर्श एकमेकांच्या वाट्याला येत असतात; पण आजही स्पर्श या संज्ञेविषयी योग्य ती जाणीव व जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. मी अशा सृजनात्मक, सात्विक स्पर्शाविषयी बोलत आहे जो स्पर्श प्रत्येक कलाकार अनुभवण्यासाठी अक्षरशः उतावीळ असतो, उत्सुक असतो, तो स्पर्श त्याला एक वेगळी ताकद देणार असतो आणि तो म्हणजे आपल्या रंगभूमीचा स्पर्श!!

नऊ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आई जशी आपल्या बालकाला कवेत घेण्यास उत्सुक असते तसेच काहीसे नाते आणि उत्सुकता पहिल्यांदा रंगमंचावर येताना असते, नव्हे ती दर प्रयोगांगणिक असतेच! कलाकार आणि रंगभूमीचं नातं हे स्पर्शाने खुलते, वाढत जाते. रंगभूमी ज्या मायेने कवेत घेते, कलाकार बागडायला मोकळा!


ही सगळी प्रस्तावना मांडण्याचे कारण असे की आपण आपल्याच विश्वात असतो. मात्र ते विश्व अलौकिक जगाशी कमी व्यावहारिक जगाशीच जास्त जोडलेले असते आणि व्यवहार आपल्या संवेदना, भावना, नाजूक क्षण कधी आणि कसे ओरबाडतो हे बर्‍याचदा समजतही नाही. आपण ठरवल्याप्रमाणे साचेबद्ध आयुष्य जगत राहतो; पण एकत्र जगण्याचा अभ्यास करून का जगू नये… एक भूमिका बजावताना दुसरी भूमिका, जबाबदारी राहून जात असेल तर थोडं थांबावं, विचार करावा आणि मग पुढे जावं, थोडं थांबल्याने काही नुकसान होत नाही उलट तो काळ, ते क्षण दोघेही सोबत जगत जातात. आयुष्यात अनेक सुखद क्षण डोकावून जातात; पण त्यांचे स्वागत कसे करावे हे मात्र कोणत्याच पुस्तकात कधी सांगितले जात नाही, हे महत्त्वाचे क्षण हातचे सुटू नये यासाठी व्यवहार आणि संवेदना यांची सांगड कायमस्वरूपी घालण्यासाठी उपयोगी येते माणुसकीची प्रक्रिया! जी हळूवार धाग्यातून मायेच्या स्पर्शाची पखरणही करते आणि मुळात त्याची जाणीव आपल्यापर्यंत पोहचते.

“थिएटर ऑफ रेलेवन्स” च्या जीवननाट्य प्रक्रियेत मी एक कलाकार म्हणून नाते, स्पर्श, संवाद, संवेदना, व्हायब्रेशन्स याविषयी अभ्यासत आणि अनुभवत असताना ‘दृश्य’ आणि ‘अदृश्य’ जाणिवांविषयी देखील अनुभवू लागले आणि या जाणिवा ‘कलाकार’ म्हणून वाढत असताना, ‘माणूस’ म्हणून प्रत्येक नात्यातही बहरत गेल्या.

दर प्रयोगाआधी रंगमंचावर फिरून आणि आलाप प्रक्रियेने रंगमंच आणि कलाकाराचे नाते घट्ट केले जाते. त्याचप्रमाणे दुरावलेल्या नात्यांनाही वेळ, संवाद, साधनेचे खतपाणी घालून भक्कम करता येते हे नव्याने समजले. प्रत्येक प्रयोगाआधी तर मंचाच्या मध्यभागी सर्व कलाकार गोलाकार फिरून आणि मग झोपून आलाप आणि साधना करत सकारात्मक व्हायब्रेशन्स निर्माण करताना मी अनुभवले आहे आणि त्यानंतरचा प्रयोग हा नेहमीच घट्ट बांधणीने एकत्र रचनात्मक स्वरूपात सादर होतो. त्यात शिस्त असते, सावधानी असते, अलर्टनेस असतो आणि मुख्य म्हणजे एका अदृश्य तरंगाने सर्व कलाकार एकमेकांशी आणि लेखक-दिग्दर्शकाशी, रंगभूमीशी आणि मुख्यतः प्रेक्षकांशी व्हायब्रेशनली जोडले जातात. मला या प्रक्रियेचे हेच अप्रूप वाटते की जसे कलाकाराचे मंचाशी नाते घट्ट होत जाते तसा तो स्वतःच्याही अधिक जवळ जातो आणि ही प्रक्रिया मानवीय संवेदना भक्कम करून मानवी नातीही घट्ट विणत जाते.

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित अनहद नाद- Unheard Sounds Of Universe नाटकाच्या प्रयोगादरम्यान रंगभूमीच्या स्पर्शाची एक ओजस्वी अनुभूती मी अनुभवली. आजही तो क्षण आठवून अंगावर रोमांच उभे राहतात. असे अनुभव उत्तम कलाकृती सादर होत असताना प्रत्येक संवेदनशील कलाकाराला येतात आणि येत असावेत…एक अशी धुंदी, एक अशी टाळी लागते सादरीकरणा दरम्यान की आपण तिथे नसतोच, एका वेगळ्याच विश्वात फिरून येतो जे आपण कधी पाहिले वा अनुभवलेही नसते, तो क्षण फक्त माझा आणि त्या कलाकृतीचा होता यालाच एकरूप होणं म्हणत असावेत आणि यात महत्त्वाचा त्रिकोण हा जोडता येतो की कलाकार रंगमंचावर असताना जे रोमांच अनुभवतो ते फक्त त्याच्यापुरतेच सीमित नसतात तेच व्हायब्रेशन्स त्याच क्षणी प्रेक्षकांपर्यंतही पोहचत असतात आणि म्हणूनच ते या सुखद क्षणांचे साक्षीदार होतात आणि अनुभूतीचे समाधान त्यांच्यापर्यंतही पोहचते. हीच आहे कलेची ताकद, कलेतील कलात्मकता जी अदृश्य स्वरूपातही आपली दृश्य अनुभूती देते!!

या तत्वांशी संबंधित रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित बोध ही कविता सोबत जोडत आहे.

बोध 
-मंजुल भारद्वाज 
स्पर्श, गंध, भाव 
है जीवन बोध
मीत, प्रीत, रीत
है संसार बोध
आकर्षक, मोहक, अदा
है सौन्दर्य बोध 
चाहत, सहवास, त्याग 
है प्रेम बोध 
ज्ञान, संज्ञान, विज्ञान 
है दृष्टि बोध 
दृष्टि जैसी सृष्टि
है संकल्प बोध 
सत्य, निष्ठा, न्याय
है मानवता बोध
जड़,चेतन,जन्म 
है सृजन बोध 
निरिक्षण, धारण, सम्प्रेष्ण 
है कला बोध 
अर्पण, समर्पण, तर्पण 
है मुक्ति बोध!

मुळात हे रेझोनेशन, हे तरंग व त्याचा शोध हा एक वैज्ञानिक भाग आहे. या वैज्ञानिक तत्वाला थिएटर ऑफ रेलेवन्स मानवीय तत्वांशी जोडतं. जसा “अनहद नाद” कोणत्याही दोन वस्तूंच्या घर्षणाशिवाय निर्माण होतो जो अदृश्य वा अमूर्त स्वरूपात जाणवतो, तसा हा “अनहद स्पर्श” कोणत्याही स्पर्शाशिवाय शिवून जातो, आपल्याशी संवाद करून जातो. रंध्रारंध्रातून रोमांच उभे करतो आणि आपण इथे असूनही या जगात नसतो!

हाच तो “स्पर्श” जो मायेचा, विश्वासाचा, आपलेपणाचा, आपुलकीचा, सद्विवेकाचा, चेतना निर्माण करणारा, अंगावर रोमांच उभे करणारा असतो जी संवेदना ‘कला’च निर्माण करू शकते. हा स्पर्श ‘माणुसकीचा’ असतो. जे हे रोमांच आपण रंगमंचावर अनुभवतो तेच आपल्या वैयक्तिक आयुष्यात, प्रत्येक नात्यात अनुभवण्यास मिळाले तर जीवन किती सुंदर होऊन जाते! हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय समजणार नाही. ते सत्व, ती सात्विकता तेव्हाच निर्माण होते जेव्हा समर्पण असते, विश्वास असतो, आपुलकी असते! आज या भावना, संवेदना, जाणिवा कुठेतरी हरवत जात आहेत त्या जपणं हे एक ‘कलाकार’ आणि एक ‘माणूस’ म्हणून आपली जबाबदारी आहे.

चार वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर निर्माण झालेल्या अनहद नाद – Unheard Sounds Of Universe या नाटकाच्या माध्यमातून कलात्मक मानवीय तरंग रेझोनेट करण्यात आले.

दादर येथील श्री शिवाजी नाट्य मंदिरात सकाळ, दुपार, संध्याकाळ या नाटकाचे प्रयोग झाले आणि त्यातून अशा वैचारिक नाटकांची चर्चा होण्यास सुरुवात झाली आणि त्यातून रंगभूमीचा तत्वांशी संबंध आहे या विचाराचे पुनर्मंथन सुरू झाले.


‘अनहद नाद’चे कलात्मक स्पर्श, तरंग, व्हायब्रेशन्स नाट्यगृहापासून प्रेक्षकांना आणि कलाकारांपासून ते आपल्या रंगभूमीला अधिकाधिक समृद्ध करत आहेत.


-योगिनी चौक (रंगकर्मी)