Pages

Sunday, July 21, 2019

विश्वाला एकसूत्रात बांधते नाटक

आपलं महानगर
२१  जुलै २०१९
नाटक बघून प्रेक्षकांचे हे म्हणणे होते की ही एक शक्ती आहे जी आमच्या मनापर्यंत पोहोचली ..भारतीय नदी आणि पाण्याविषयी वाचलेल्या पुस्तकांची वास्तविकता अनुभवली.. या नाटकात शेवटी आम्ही प्रेक्षकांना आमच्या सोबत रंगमंचावर सामील करायचो .. आनंदाने आमच्यात मिसळून ते एक व्हायचे.. एक नाटक आमच्यातले बंध जोडत होते.. सगळे भेद दूर होऊन समभाव निर्माण होत होता ...



नाटक
वैश्विक स्वीकार्यतेच्या हुंकारापासून सुरुवात झालेला आमचा कारवा युरोपच्या चार देशात निघाला …युरोपमध्ये एका देशातून दुसर्‍या देशात स्थलांतर .. म्हणजेच एका समृद्धीतून, एका लोक संस्कृतीतून दुसर्‍या समृद्धीत, लोक संस्कृतीत आम्ही प्रवेश करत होतो …भारतातून जर्मनी, जर्मनीतून स्लोव्हेनिया मग तिथून ऑस्ट्रिया, इटली … आणि या प्रवासात आमच्या सोबत होती थिएटर ऑफ रेलेवन्स या तत्वाची प्रकिया जी या प्रवासाला, अनुभवाला आमच्या आत झिरपवत होती..
सहासष्ट दिवसात २९ नाटकांचे प्रयोग आणि २७ कार्यशाळा झाल्या …सुमारे दहा हजार कि.मी.चा प्रवास आणि जवळजवळ 5000 लोकांचा प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभाग झाला.. विद्यार्थी, शिक्षक, कलाकार, सामान्य जनता यांचा सहभाग होता… छोट्या छोट्या गावापासून मोठ्या शहरापर्यंत, शाळेपासून मोठ्या थिएटरपर्यंत, व्यक्तीपासून ते समुदायापर्यंत आम्ही या तत्वाचा प्रवास केला आणि लोकांमध्ये चेतना पेटवली.

‘ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर’ या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगानंतर हॅम्बर्ग येथील लोकांमध्ये ती जागृती निर्माण झाली तिथे पाण्याचे खाजगीकरण करण्यासाठी येणार्‍या एका कंपनीविरोधात तेथील जनतेने या नाटकामुळे प्रेरित होऊन आंदोलन केले आणि खाजगीकरणाच्या विरोधात उभे राहिले. कलेला सीमेचे, भाषेचे बंधन नसते … कलेची एकच भाषा ती म्हणजे माणुसकी .. ही आमची कलात्मक प्रतिबद्धता, आत्मसात केलेले तत्व जाणून घेण्यासाठी युरोपियन उत्सुक होते… याची नोंद ते वेळोवेळी घेत होते .. युरोपियन वर्तमानपत्राच्या माध्यमातून आम्ही पहिल्या पानावर झळकत होतो .. माणुसकीचे तत्व जपणारी कृती आपल्याकडे भारतात पहिल्या पानावर छापली जात नाही. आपल्याकडे मीडिया व्यक्तीची प्रसिद्धी, तिचे पद बघून जागा देते; पण मला स्वतःविषयी अभिमान वाटत होता की तिथे माझ्यातल्या कलात्मक प्रतिबद्धतेची त्यांनी नोंद घेतली. आमची कलात्मक प्रतिबद्धता आणि भारतीय नाट्यकलेतील व्यापकता त्यांना जाणवली त्याबद्दल त्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. जो पुरोगामी म्हणवणार्‍या भारतीय रंगकला जगतात अभावाने आढळतो ..

जर्मनीमधील शाळा अप्रतिम होत्या … त्यांचे वर्ग, हॉल, इनडोअर, आऊटडोअर खेळांची मैदाने, तेथील रंगमंच, lights, जेवणासाठी खास बांधलेले मोठे प्रशस्त हॉल, कॅन्टीन, जेवणासाठी तयार असलेले पौष्टिक पदार्थ …तेथील लहान मुलांची एक गोष्ट माझ्या लक्षात राहिली ती म्हणजे जेवण झाल्यावर आपापली ताटे धुण्याच्या ठिकाणी नेणे आणि फडके व पाणी घेऊन टेबल साफ करणे हे ते स्वतः करत होते ..स्वावलंबी बनत होते. लहान मुलांचे शिबीर म्हणजे मोठी जबाबदारी होती .. कारण लहान मुलांना गुंतवून ठेवणे आणि त्यांना सतत नवीन देणे यात कसरत होत होती..त्यात एक लहान मुलगा होता ‘निकितान’ नावाचा .. प्रचंड मस्तीखोर.. एका जागी बसेचना. मंजुल सर म्हणाले, त्याला त्याच्या मर्जीने राहू दे, बळजबरीने शिकवण्यापेक्षा मुलांच्या कलेने घेणे गरजेचे आहे .. त्यांना मोकळीक आणि space देणे जरुरी आहे .. आपण दिलेली मोकळीक आणि space ची जाणीव त्यांना मजबूत करते..


मुलांसाठी शिबीर घेताना मुलांमध्ये झालेल्या परिवर्तनाला बघून तिथल्या शिक्षकांनी त्यांच्या स्वतःसाठी शिबीर घेण्याची इच्छा जाहीर केली ..त्यांचे प्रश्न होते की कठीण विद्यार्थ्याला कसे हाताळावे ? कुठले तंत्र, पद्धती, सूत्र वापरू शकतो ? प्रत्येक विद्यार्थी हा वेगळ्या मानसिकतेचा, वेगळ्या पार्श्वभूमीचा, वेगळ्या विचारांचा असतो आणि आमच्यासाठी तर आम्ही वेगळ्या खंडात होतो हे आव्हान होते.. मंजुल सरांनी एका विद्यार्थिनीला उभे केले आणि शिक्षकांना सांगितले की, “हिला तुमच्या मनासारखा आकार द्या” .. आणि त्या विद्यार्थिनीला सांगितले की, “यांचे अजिबात ऐकू नको” .. शिक्षकांनी त्यांच्या मनासारखे आकार देण्याचे खूप प्रयत्न केले पण जमले नाही .. यावरून हे समजले की विद्यार्थी म्हणजे नुसते दगड किंवा वस्तू नसतात जे केवळ शिक्षकांच्या विचारांनी चालतील.. त्यांना वेगळे व्यक्तिमत्व असते .. त्यांना गृहीत धरणे चुकीचं आहे… आपल्या विचारांशी त्यांच्या विचार प्रवाहाशी जोडून नीतीगत दिशा दाखवणे शिक्षकांचे काम असते .. आदेश देण्यापेक्षा विद्यार्थ्यांशी जुळवून घेणे, मनाने नाते जोडणे, विश्वास निर्माण होणे जरुरी आहे .. विद्यार्थ्यांचा हा विश्वास असतो की शिक्षक त्याच्यासाठी नेहमी चांगलाच विचार करतो .. विद्यार्थी वस्तू नसून माणूस आहे ..त्यांच्या स्वतःच्या कल्पनेत उंच भरारी घेण्याची शक्ती त्यांच्यात असते .. ती शक्ती वाढवणे चांगल्या शिक्षकांनाच जमू शकते .. सुरक्षित स्पर्शाची भाषा विद्यार्थ्यांना कळते ..सुरक्षित वातावरणात विद्यार्थी कधी प्रश्नोत्तरे, कधी संवाद-विवाद तर कधी खेळून नवीन प्रयोग करतात … शिक्षकाची भूमिका नेहमी ‘मला’ हे करायचे आहे विद्यार्थ्याला हे दाखवायचे, शिकवायचे आहे, विद्यार्थ्याने असे करावे अशी असते .. पण खरा शिक्षक ‘मला’ हा शब्द न वापरता ‘आपल्याला’ काय शिकायचे आहे या प्रक्रियेला पाहतो.. शिकणे आणि शिकवणे हे दोन्ही बाजूने सुरू असते ..शिक्षकांच्या मानसिकतेला, स्पंदनांना त्यांच्या तणावाला विद्यार्थी अचूक पकडतात.. शिस्तीच्या नावाखाली कधी कधी बुद्धीला बंद केले जाते … इकडे तिकडे बघू नका, बोलू नका, प्रश्न विचारू नका यामुळे त्यांच्या जिज्ञासेला आपण मारतो … शिकणे ही विद्यार्थ्याची जबाबदारी आहे हे त्यांना जाणीव करून देणे गरजेचे आहे…शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भूमिकेत जाऊन ते कसे शिकतात हे पाहणे गरजेचे आहे .. विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून मुलांच्या सकारात्मक ऊर्जेला दिशा देणे शिक्षकांवर असते..

नाटक बघून प्रेक्षकांचे हे म्हणणे होते की ही एक शक्ती आहे जी आमच्या मनापर्यंत पोहोचली ..भारतीय नदी आणि पाण्याविषयी वाचलेल्या पुस्तकांची वास्तविकता अनुभवली.. या नाटकात शेवटी आम्ही प्रेक्षकांना आमच्या सोबत रंगमंचावर सामील करायचो .. आनंदाने आमच्यात मिसळून ते एक व्हायचे.. एक नाटक आमच्यातले बंध जोडत होते.. सगळे भेद दूर होऊन समभाव निर्माण होत होता …

प्रत्येक प्रक्रिया तत्वाने सुरू होते मग प्रयोग असो किंवा कार्यशाळा.. त्या तत्वाला ध्येयाची जोड असणे महत्त्वाचे .. या प्रवासात माझ्या देशाबद्दल भारताबद्दल कुतूहल अजून वाढले.. परदेशात जाऊन आपल्या देशाला त्रयस्थ म्हणून बघण्याची दृष्टी लाभली.. काय पुढे न्यायचे, काय बदलायचे याचा अंदाज आला…

एक नाटक, एक विचार, एक परिवर्तन हेच आमच्या कलात्मक साधनेचे ध्येय आमच्या भरारीसाठी प्रेरित करते .. आणि या विश्वाला एकसूत्रात बांधण्यासाठी प्रोत्साहित करते. रंगभूमी मग ती माझ्या मातीतली असो किंवा संसाधन संपन्न युरोपमधील असो ती माझ्यातल्या कलाकारामध्ये माणुसकीचे बीज रोवते आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात, विचारात अंकुरित होऊन या विश्वाला माणुसकीचे नंदनवन बनवते…


– अश्विनी नांदेडकर (रंगकर्मीं)


Sunday, July 14, 2019

वैश्विक स्वीकार्यतेचा हुंकार

आपलं महानगर
१४ जुलै २०१९

युरोप हे शिक्षण पद्धतीबाबतीत अग्रेसर आहे... त्यांच्या मते ते विद्यार्थांना प्रत्येक सुविधा पुरवतात... विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रोत्साहित नाही करू शकत... जर्मन पॅडागॉगी ही जगात शिक्षणासाठी श्रेष्ठ मानली जाते ...चौकटीबाहेर शिक्षणपद्धतीची म्हणजे थिएटर ऑफ रेलेवन्सची प्रक्रिया त्यांच्यासाठी नवीन होती. कारण जो वर्ग त्यांच्यासाठी सर्वात मस्तीखोर आणि बंडखोर होता तोच वर्ग शिस्तबद्ध पद्धतीने, सृजनशील आणि भन्नाट रीतीने आमच्याशी कनेक्ट झाला.


रंगकर्मी
प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणापर्यंत नसतो … प्रवास बाह्यवातावरण ते अंतर्मन असा असतो … त्या ठिकाणाच्या अणुरेणूपर्यंत असतो …प्रवासाचा थेट परिणाम आपल्या व्यक्तित्वावर होत असतो … म्हणून प्रवासात शोध महत्वाचा असतो …परदेशात आपण निसर्गसौंदर्य पाहतो … पण परदेशीय लोक कशाप्रकारे आयुष्य जगतात?… त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे? ते काय खातात? काय परिधान करतात? त्यांच्यात आणि आपल्यात काय साम्य आहे आणि काय वेगळेपण आहे? हे सगळे त्यांच्यात राहिल्याशिवाय आपण नाही अनुभवू शकत.

ही संधी आम्हाला मिळाली …जर्मनीमध्ये गेल्यावर आम्ही प्रत्यक्ष जर्मन परिवारांमध्ये राहिलो …त्यांच्या खाण्यापिण्याची सवय, जगण्याची पद्धत जवळून अनुभवली … ही खर्‍या अर्थाने सांस्कृतिक देवाणघेवाण होती… तेथील घरे म्हणजे स्वप्नवत आहेत.. सगळ्या सुखसोयींनी सज्ज… घरांच्या भोवताली असलेली बाग, फुलांनी डवरलेल्या बाल्कनीज, स्वयंपाक घरातील साधने आणि महत्वाचे म्हणजे चोवीस तास पाणी आणी वीज… आपल्याकडे या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जीवनाचा अर्धा वेळ जातो… आज पाणी येईल का? लाईट जाईल का? पण युरोपमध्ये तसे नव्हते … प्रत्येकाला special खोली, special गाडी, special वागणूक…. पहिल्यांदाच आम्ही चारी बाजूंनी झाडांनी वेढलेल्या एका युथ हॉस्टेलमध्ये राहिलो…जेवणाची वेळ आली त्यावेळी खूप उत्सुकता होती.. पण भात, सलाड, राजमा, चविष्ट वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक ब्रेड, जॅम, ताजी फळं, भाज्या बघून मन तर तृप्त झालेच आणि पोटही तृप्त केले…

तिथे जर्मन विद्यार्थी आणि शिक्षकांचे आम्ही workshop घेतले .. प्रत्येक प्रयोग आणि workshop मधून मिळालेल्या अनुभवातून आम्ही अधिक समृद्ध होत गेलो…सतत भारताचे सांस्कृतिक दूत आहोत हे भान होते..आमचे पहिले workshop हँबर्गच्या शुले अँमसी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी होते … जर्मन लोकांसोबत पहिला सुसंवाद… त्याची सुरुवात केली हस्तांदोलनाने…आणि हाच triggerpoint होता आमच्या आणि त्यांच्या मधल्या connection चा …सहभागींना मंजुल सर जाणीव करून घ्यायचे की ही घटना प्रत्येकासाठी ऐतिहासिक आहे, कारण शिकण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी ही सर्वात मोठी सुसंधी आहे… भारतीय विद्यार्थ्यांचे बाहेरच्या जगातील मुलांना भेटणे, शिकवणे अशा घटना सारख्या नाही घडत…या शाळेने मंजुल सरांना request केली की आमच्या शाळेत एका क्लासचे शिबीर घेणार का, जो आमच्या शाळेतील सर्वात खोडकर क्लास आहे …ही मुले अजिबात ऐकत नाहीत…हे आव्हान आम्ही स्वीकारले.


मुळात ही मुले शिक्षणाच्या चौकटीबाहेर असलेली आव्हाने या शिक्षणपद्धतीला देत होती… त्यांच्या भावनिक गरजा, भाषेचा परिवेश, त्यांचे प्रश्न शालेय शिक्षणपद्धती बाहेरील होते … साचेबद्ध चौकटीत बसणारे नव्हते.. आणि जे साचेबद्ध पद्धतीत बसत नाहीत “थिएटर ऑफ रेलेवन्स” त्यांना माणूस म्हणून बघतो …आम्ही या वर्गाला खोडकर क्लास म्हणून न भेटता एक माणूस म्हणून भेटलो. कुठलाही पूर्वग्रह न ठेवता त्यांना हे जाणवू दिले की आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांना भारतीय नृत्य, संगीताच्या दुनियेत नेलं. त्यात ती रमली, त्यांना प्रोत्साहित केले, वेगवेगळ्या पातळ्या दिल्या. नृत्य, संगीत, नाटक आणि हाच खोडकर-बंडखोर वर्ग परफॉर्म करणार्‍या वर्गामध्ये परावर्तित झाला. हेच “थिएटर ऑफ रेलेवन्सचे” यश होते की नाटक लोकांची मानसिकता बदलवते आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडवते…या शिक्षणपद्धतीने त्यांना खोडकर अशी छबी दिली होती, आम्ही त्यांच्या उर्जेला सृजनात्मक पद्धतीने मोकळे केले.. त्यांचे वेगळेपण अधोरेखित केले आणि ते आमचे मित्र बनले ..
त्यानंतर शिक्षकांची खूप बोलकी प्रतिक्रिया आली की युरोप हे शिक्षण पद्धतीबाबतीत अग्रेसर आहे… त्यांच्या मते ते विद्यार्थांना प्रत्येक सुविधा पुरवतात… विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रोत्साहित नाही करू शकत… जर्मन पॅडागॉगी ही जगात शिक्षणासाठी श्रेष्ठ मानली जाते …चौकटीबाहेर शिक्षणपद्धतीची म्हणजे थिएटर ऑफ रेलेवन्सची प्रक्रिया त्यांच्यासाठी नवीन होती कारण जो वर्ग त्यांच्यासाठी सर्वात मस्तीखोर आणि बंडखोर होता तोच वर्ग शिस्तबद्ध पद्धतीने, सृजनशील आणि भन्नाट रीतीने आमच्याशी कनेक्ट झाला … त्यांना खुला मंच दिला आणि त्यांचे जीवन, त्यांची शाळा, संस्कृती, समाज, देश आणि मग विश्वासाठी जागृत केले…

युरोपमध्ये आमच्या ‘ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर’चा पहिला प्रयोग अविस्मरणीय होता … या नाटकाचा प्रीमियर होता तोही युरोपमध्ये …पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय रंगमंचावर युरोपियन प्रेक्षकांसमोर नाटक सादर करताना आम्ही खूप उत्सुक होतो …प्रत्येक कलाकाराचे एक स्वप्न असते की आंतरराष्ट्रीय रंगमंचावर परफॉर्म करावे … एक कलाकार म्हणून माझे स्वप्नापलिकडील जग साकार होत होते … आमचा प्रयोग बघून जर्मन प्रेक्षक marvelous , bravo असा प्रतिसाद देत होते … शून्यापासून सुरुवात केलेल्या कामाचे ते एक फलित होते… आज आपल्याकडे भारतीय रंगभूमीवर किंवा कलाजगतात पाश्चिमात्य शैलीचे अनुकरण केले जाते … तिथे युरोपियन प्रेक्षकांनी आपल्या भारतीय सांस्कृतिक ठेव्याला आमच्या नाटकाला उभं राहून दाद दिली … त्यावेळी मनामध्ये असंख्य विचार येत होते.

ही दाद मिळवण्यासाठी त्याचा मागे किती मेहनत होती हे नजरेसमोर येत होते.. मी थेट इथे येण्यापूर्वीचे दिवस आठवत येत होते. आमची तालीम शांतीवन येथे निसर्गाच्या सान्निध्यात करायचो …धो धो पाऊस असूनही, वीज नसताना, साप विंचू किटक इकडे तिकडे फिरत असतानाही आमची तालीम कधी थांबली नाही. कारण या तालमीत संचित ज्ञानाचा अखंड झरा व्हायचा… प्रत्येक वेळी नवीन अनुभव, नवीन रस्ता, नवीन विचार, नवे आयुष्य…नाटकाचे इतर पैलू जसे रंगमंच, रंगशिल्प, रंगशैली या शब्दांची नव्याने ओळख होत होती…आम्ही नाटकात नृत्य, वादन, गायन एकसाथ live करत होतो ते रेकॉर्रेड नव्हते… म्हणजेच multitasking करत होतो …भारताच्या विविध प्रांतात, वेगवेगळ्या धर्मात असलेले पाण्याचे महत्व आम्ही माहीत करून घेतले … नाटकाची कन्सेप्ट व्यवस्थित समजण्यासाठी विषयाची सखोल माहिती घेऊन अभ्यास केला. आतापर्यंत माझी मूलभूत गरज असलेल्या पाण्याविषयी मला नव्याने कळत होते.. पाणी हा नैसर्गिक हक्क आहे. त्याचे बाजारीकरण होतंय. हे जाणले नाही तर पाण्यावरून युद्ध अटळ आहे. नाटक तर आम्ही करतोय, पण नाटकाविषयी आम्हाला कितपत जाणीव आहे याची दखल घेतली…

एकाच वेळी सगळ्या आयामांवर काम करत होतो, तेही कुठलीही गोष्ट अनुकूल नसताना वातावरण विरोधात होते, परिवाराला काळजी होती. कारण घरची सून, मुलगी, बायको, आई, बहीण ही 66 दिवस परदेशात राहणार होती, इंग्लिश भाषेत नाटक असल्याने स्पष्ट इंग्लिश बोलण्याचे आव्हान होते … आरोग्य सांभाळण्याचे आव्हान आणि सर्वात महत्वाचे की वेळेच्या आधी तयार होणे …

मला एक प्रसंग आठवतो की मी या नाटकात तब्बल सोळा वेशभूषा बदलायचे …आणि सुरुवातीला मी हो नाही करत होते की एवढ्या कमी वेळात मी वेशभूषा कशी बदलू या गोष्टीवर मी अडून बसले … पण हे अडणे मानसिक होते याची जाणीव सरांनी करून दिली.

शिबिरात प्रत्येकजण समान कार्य करायचा … जसे की अनुभव लिहिणे, चैतन्य अभ्यास, नाटक करणे तरीही प्रत्येकासोबत वैयक्तिक प्रक्रिया सुरू होती… प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे होते …पण प्रत्येकाचा जगण्याचा अनुभव वेगळा होता. कारण प्रत्येकाचे जगण्याचे विचार वेगळे असतात…

नाटक म्हणजे एक आयती स्क्रिप्ट हातात मिळणार, आपण ती वाचून आपली भूमिका असलेलं पाठांतर करणार आणि दिग्दर्शक सांगेल तसे अभिनय करणार …. पण इथे अशी प्रक्रिया नाही घडली … इथे सुरुवातीला आम्ही कलाकारांनी शोध सुरू केला .. पाणी आणि आपण याचा संबंध शोधला तोही वैश्विक स्तरावर… आणि त्यानंतर नवनवीन शोधानुसार नाटक तयार करू लागलो … प्रत्येक वेळी नाटकाची, त्यातील तत्वाची आणि स्वतःच्या वैचारिकतेची पातळी वाढवत गेलो.
वैचारिक पातळी वाढणे म्हणजे वैश्विक स्वीकार्यतेची सुरुवात हा दृढ विश्वास निर्माण झाला.

हीच वैचारिक क्षमता पाणी व त्याचे खाजगीकरण या मौलिक मुद्याला सातासमुद्रापार, म्हणजे जिथून खाजगीकरण आपल्याकडे आले तिथपर्यंत थेट पोहचवण्याचे माध्यम बनली. पाणी म्हणजे नैसर्गिक संपदा, पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे सत्व, सत्व म्हणजे कला आणि ‘ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर’ हे नाटक म्हणजे विश्वाला जगवण्याचा कलात्मक हुंकार…– अश्विनी नांदेडकर (रंगकर्मी)



Sunday, July 7, 2019

भरारी…

आपलं महानगर
७ जुलै २०१९

मी निघाले होते युरोपला एक व्यक्ती म्हणून, माझे अस्तित्व घडवण्यासाठी... ... आई, बहीण, पत्नी, मुलगीपेक्षा एक माणूस म्हणून ... माझ्या कलात्मक समर्पणाच्या जोरावर ... मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित "ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर" हे नाटक घेऊन ...घरातून निघून एअरपोर्टपर्यंत केलेला एक तासाचा प्रवास मला खोल विचारात घेऊन गेला माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा परदेशात निघाले होते तेही स्वकर्तृत्वावर, स्वतःच्या कामावर विश्वास ठेवून.





स्वप्नांची सुरवात

माझी उडाण..

आकाशात असल्यासारखं वाटतंय


आता सवय झाली आकाशाची

इथून जग अजून सुंदर वाटतंय

अजून आपलंसं वाटतंय

पंखातलं बळ वाढवायचं

आता ढगांमध्ये विसावा घेईन म्हणते

पावसाचं पाणी प्यावे म्हणते

सारं विश्व डोळ्यात सामावून परत धरतीकडे झेप घेईन म्हणते ..

युरोप एक सुंदर खंड … निसर्गाने भरलेला आणि व्याप्त असलेला … भारतीय सिनेमातून आपल्याला अनेकदा याचे दर्शन झाले आणि प्रत्येक भारतीयांच्या मनात कधीतरी परदेशवारी करून ते जग पाहण्याची अनुभवण्याची इच्छा जागृत झाली … विदेशात जाणे तिथल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे … निवडक ठिकाण पाहून आनंद घेणे … या सगळ्यात मीही होते पण खरंच एव्हढ्यापुरता आपली मानसिकता मर्यादित आहे का? आपण परदेशवारी करतो पण या परदेशवारीला बघण्याचा आणि अनुभवण्याचा आपला दृष्टीकोन काय असतो? मनोरंजन की शोध … खूप मेहनत करून आपण पैसा कमावतो … आणि आपण मेहनतीने कमावलेला पैसा या सौंदर्याला पाहण्यासाठी खर्च करतो … आयुष्यातील काही चार दिवस मौजमजा करून येतो … पण हा अनुभव कमावणे जमतो का ? की युरोप बघून आलो छान वाटले इथपर्यंत मर्यादित राहतो.

मी निघाले होते युरोपला एक व्यक्ती म्हणून, माझे अस्तित्व घडवण्यासाठी… … आई, बहीण, पत्नी, मुलगीपेक्षा एक माणूस म्हणून … माझ्या कलात्मक समर्पणाच्या जोरावर … मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित “ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर” हे नाटक घेऊन …घरातून निघून एअरपोर्टपर्यंत केलेला एक तासाचा प्रवास मला खोल विचारात घेऊन गेला माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा परदेशात निघाले होते तेही स्वकर्तृत्वावर, स्वतःच्या कामावर विश्वास ठेवून. खरंतर ज्यावेळी स्वप्न प्रत्यक्षात उतरायला लागतात त्यावेळी चटकन विश्वास नाही बसत आणि ही तर स्वप्नापलिकडील गोष्ट होती …कधी हा विचारच केला नव्हता की मी युरोपला जाईन. खरंच मी स्वतःबद्दल हा विचार का कधी केला नाही? का कधी स्वतःवर हा विश्वास ठेवला नाही. माझ्यात उंच भरारी घेण्याचे बळ आहे, ही योग्यता मला ठाऊकच नव्हती. कोणी कधी सांगितले ही नाही.. का सांगितले नाही? माझ्या आजूबाजूला वावरणार्‍या लोकांच्या, परिजनांच्या डोक्यातही आले नाही .. कारण सतत स्वतःला, स्वतःच्या मानसिकतेला एका चौकटीत अडकून घेतले आहे … स्वप्न पाहण्याची मति कुंठीत झाली आहे… क्षितिजा पल्याड पाहायची सवयच नाहीए.. या चौकटीला तोडत मी निघाले होते माझ्यातील आई, बहीण, मुलगी, सून , बायको या रुपांना

समृद्ध करण्यासाठी माझ्यातल्या अश्विनी नावाच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध करण्यासाठी मी निघाले होते.मुंबईचे इंटरनॅशनल एअरपोर्टवर आमचा ग्रुप आमच्या भरारीची वाट पाहत होता .. पहिल्यांदा देशाच्या बाहेर पाऊल ठेवणार होते … आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार होते … त्यामुळे उत्सुकता आणि जबाबदारीचे भानही होते … तिथे आम्ही भारताचे सांस्कृतिक दूत म्हणून गेलो होतो तिथे एक व्यक्तीपेक्षा माझी ओळख भारत इंडिया ही होती … त्यामुळे माझी वागणूक, माझी क्रिया, माझे बोलणे आणि माझे काम ही माझी नाही तर भारताची छबी निर्माण करत होती… मुंबई एअरपोर्टला पहिल्यांदा इमिग्रेशन फॉर्म भरताना सुरक्षितता, दुसर्‍या जगात जाण्याची भावना निर्माण होत होती …विमानात बसण्याचा अनुभव आधीही होता, पण इंटरनॅशनल प्रवासाची पहिलीच अनुभूती होती … माझं त्यादिवशीचे दुपारचे जेवण मी ढगांवर बसून घेत होते. विमानाच्या खिडकीतून दिसणारे विश्व नवखेच होते. मुंबई सोडून जसे जर्मनीच्या दिशेने प्रवास सुरु केला तसा एक ठळक फरक जाणवला. सगळी जमीन हिरवीगार. जर्मनीला आकाशातून पाहताना जाणवले की जमिनीच्या प्रत्येक भागाचा योग्य वापर केला गेलाय … चौकोना चौकोनात शेत, टुमदार घरं नाहीतर जंगल होते …कोणताही जमिनीचा भाग रिकामा नाही, ओसाड नाही …असे आकाशात तरंगत ढगांच्या सान्निध्यात माझ्या विचारांची मालिका सुरू होती …

हॅमबर्ग या शहरात आमचे विमान लँड झाले. जर्मनीमधील दुसरे सर्वात मोठे शहर. 18 लाख जनसंख्या असलेले शहर. त्या जमिनीवर पाऊल ठेवताना क्षणभर मनात प्रसन्नता पसरली. ज्यावेळी क्षितिजा बाहेरील स्वप्न खरी होताना जाणवत होती. आयुष्यात एक स्त्री म्हणून, एक गृहिणी म्हणून भूमिका पार पाडताना कधी एक माणूस म्हणून स्वप्न पाहायची आणि ती याच धरातलावर पूर्ण करायची भूमिका सुरू झाली कळलेच नाही.

हम्बर्गला विमानतळावर उतरल्यावर एक सुगंध मनात झिरपला. आयोजक आम्हाला receive करायला आले होते. आपल्याकडे मध्यमवर्ग स्वप्न पाहत असतो की दारात एक चारचाकी गाडी असावी. जर्मनी हा देश कार्स बनवण्यात अग्रेसर आहे. अशा देशात आम्हाला घेण्यासाठीही आयोजक आलिशान कार घेऊन आले होते ड्रायव्हर सह .. पण यात मला सर्वात विशेष वाटले ते आयोजकांचे. ते स्वतः मात्र सायकलवर आले होते, तेही एअरपोर्टला .. आणि सायकलनेच त्यांच्या ऑफिसला जाणार होते. माझा देश कार्स बनवतो. माझ्या दारात कार आहे, पण माझी आवड माझे आरोग्य काय सांगते हे जास्त महत्वाचे वाटले.

जर्मनीमध्ये उतरल्यावर माझा पहिला प्रश्न होता की कर्फ्यु लागला आहे का? कारण गर्दी कुठे आहे ? माणसे दिसतच नव्हती. मुंबईसारख्या शहरात गर्दीची इतकी सवय झाल्यावर गर्दीविरहीत रस्ते पाहणे वेगळेच होते … स्वच्छ वातावरण आणि ठळक जाणवणारी स्वच्छता, शिस्तबद्धता नजरेत भरत होती. परदेशात जागा वेगळी, व्यक्ती वेगळ्या, त्यांची संस्कृतीही वेगळी, खाण्या पिण्याच्या सवयी वेगळ्या या सगळ्या वेगळ्या वाटणार्‍या वातावरणात आपण सामावून जातो ज्यावेळी आपण मनाने मानतो की हे जग माझे आहे. हा विश्वास आपल्याला जगात कुठेही ठामपणे उभे राहायला शिकवतो. भारतातून यूरोपपर्यंतचा प्रवास केवळ शारीरिक नव्हे तर वैचारिक कक्षा रुंदवणारा होता. आता प्रवेश नव्या परिवेशात.. क्रमशः

अश्विनी नांदेडकर ( रंगकर्मी)